कान्हे – मावळ तालुक्यात जुन्या पुणे मुंबई महामार्गालगतच्या साइडपट्ट्यांवर फळ, भाजी, सरबत आणि इतर विकेते बेकायदेशीरपणे दुकाने व गाड्या लावतात. त्यांचे हे अतिक्रमण अपघाताला निमंत्रण देत असतानाही पोलीस व महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ यांना फेरीवले दिसत नाहीत का? एखादा प्राणांतिक अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल नागरिक व वाहन चालक विचारत आहेत.
एखाद्या वाहनात बिघाड झाला किंवा इतर काही कारणांसाठी वाहन उभे करायचे असल्यास साइड पट्ट्या उपयोगात येतात. अनेकदा वाहनांना ओव्हरटेक करीत असतानाही काही वाहने रस्त्याच्या खाली साईड पट्ट्यावरून नेली जातात. अनेकदा या साइड पट्ट्या खचल्यामुळे अपघातातही होतात. यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या साइड पट्ट्या या वाहन चालकांसाठी अत्यंत उपयोगी असतात. याउलट रस्त्याच्या कडेला साइडपट्ट्या नसतील तर अपघातात वाढ होण्याची शक्यता जास्त असते.
जुन्या पुणे मुंबई महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा साइडपट्ट्यांवर दुकाने थाटण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. ज्या प्लॅस्टिक कॅरेटमध्ये भाज्या किंवा फळे येतात. तीच महामार्गालगतच्या साइडपट्ट्यांवर ठेऊन त्यावर विक्रीसाठी भाज्या किंवा फळे ठेवली जातात. या रस्त्यावरून भरधाव वेगात वाहने जात असतात. त्यांना अचानक फळे किंवा भाजी विक्रीसाठी असलेली दिसली की ते ताजी आणि स्वस्तात भाजी खरेदीसाठी आपले वेगात असलेले वाहन बाजूला घेतात. अचानक वाहनाचा वेग कमी झाल्यास पाठीमागून येणाऱ्या वाहन चालकांना ते लवकर लक्षात येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते. असे छोटे अपघात यापूर्वी महामार्गावर झाले आहेत. तसेच रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात वाहने उभी करण्यात येत असल्याने यामुळे वाहतूक कोंडीही निर्माण होते. फळे, भाजी विक्री करणाऱ्यांकडे वाहतूक पोलीस व महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.
महामार्ग साईड पट्ट्यावर दुकान लावल्यास मोठ्या प्रमाणात व्यवसाय होत असल्याचे लक्षात येताच खेळणी, कपडे, शोभेच्या वस्तू, मोबाइलला स्क्रीन गार्ड लावणारे, चष्मे आधीची दुकाने देखील वाढत चाललेली आहेत. त्यामुळे महामार्गाला मंडईचे स्वरूप येऊ लागले आहे. नुकताच उन्हाळा सुरू झाल्याने लिंबू सरबत, उसाचा रस, ज्यूस सेंटरही रस्त्याच्या कडेला उभारली जात आहेत. ताजे सरबत मिळत असल्याने प्रवाशांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
नो-एन्ट्रीतून घुसणारे वाहन चालक
महामार्गावर रस्ता दुभाजक असल्यामुळे अनेकांना लांबवर वळण घेता येत नाही. कित्येक किलोमीटरचा वळसा घालण्यापेक्षा वाहन चालक “नो-एन्ट्रीतून साइडपट्ट्यावरून वाहने नेतात. साइड पट्ट्यांवर दुकाने असल्याने वाहन रस्त्यावर आणतात. अशावेळी प्राणांतिक अपघात होण्याची दाट शक्यता आहे.