पिंपरी – सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सर्वच रिक्षाचालक मालक संघटनांच्या मागण्या गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे रिक्षाचालक मालकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. विविध मागण्यांसाठी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचा पवित्रा संघटनांनी घेतला आहे.
विविध मागण्यांसाठी रिक्षा फेडरेशनचे ज्येष्ठ नेते प्रकाश झाडे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील रमामाई भीमराव आंबेडकर पुतळा स्मारक येथे ऑटो टॅक्सी चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाबा कांबळे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. रिक्षाचालकांच्या मागण्यासाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात यावे, मुक्त रिक्षा परवाना ताबडतोब बंद करून इलेक्ट्रिक रिक्षांना परमिट (परवाना) सक्ती करावी, मेट्रो स्टेशनवर मीटरने व शेअर ए रिक्षा व्यवसाय करण्यासाठी प्रत्येक मेट्रो स्टेशनवर वीस रिक्षांना परवानगी देण्यात यावी, ओला उबर वगैरे या भांडवलदार कंपन्या रिक्षांना भाडे देत नाहीत तरीही चार चाकी वाहतूक सुरू आहे. अशा वाहनांवर आरटीओने कारवाई करावी.
आग्रीकेटर पॉलिसी ड्रापबाबत रिक्षा संघटनांना विश्वासात घेऊन अग्रीकेटर पॉलिसी अंमलबजावणी करावी, सातत्याने होणाऱ्या ऑनलाइन दंडामुळे रिक्षाचालक हैराण झाले असून रिक्षांचे उत्पन्न रोजचे पाचशे रुपये व दंड मात्र हजारो रुपये भरावा लागत आहे.
यामुळे ऑनलाइन दंडाबाबत नवीन नियमावली तयार करावी. पुणे, पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयाला आरसी बुक व लायसन्स प्रिंट करण्याची व्यवस्था करावी. नवीन रिक्षा स्टॅण्डला मान्यता देण्यात यावी, या मागण्यांसाठी रिक्षा संघटनांच्या वतीने आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.