पिंपरी -कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा अत्यंत महत्वकांक्षी प्रकल्प पिंपरी-चिंचवड महापालिकेने पीपीपी तत्वावर उभारला असून या प्रकल्पाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
यासोबतच बोऱ्हाडेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राबवण्यात आलेल्या गृह प्रकल्पांतील सदनिकांचे लाभार्थ्यांना हस्तांतरण, डुडुळगाव येथे साकारण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पाचे भूमिपूजनही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते (दि.1) ऑगस्टला ऑनलाइन पध्दतीने होणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी शनिवारी (दि.29) पत्रकार परिषदेत दिली. शिवाजीनगर येथील पोलीस परेड मैदानावर ऑनलाइन पध्दतीने हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, पर्यावरण व अभियांत्रिकी विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, उप अभियंता हरविंदर बन्सल आदी उपस्थित होते.
ऍन्थोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रायवेट लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जोस जेकब यांनी या प्रकल्पाद्वारे कचरा व्यवस्थापनाच्या परिदृश्यात झालेल्या परिवर्तनाचा साक्षीदार म्हणून सन्मान व्यक्त केला. पिंपरी शहरांसाठी एक लवचिक आणि हरित भविष्य घडवण्यासाठी सर्कुलरिटी ही गुरुकिल्ली आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आभार मानतो.
महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प
पालिकेतर्फे घनकचरा व्यवस्थापनासाठी सुक्या कचऱ्यापासून 700 टी.पी.डी क्षमतेच्या प्रकल्पामधून 14 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. ज्यामध्ये 1000 टी.पी.डी क्षमतेच्या मटेरियल रिकव्हरी फॅसिलीटी व 500 टी. पी. डी क्षमतेच्या कंपोस्ट प्लांटचा समावेश आहे. शहरात दैनंदिन सुमारे 1 हजार 150 मेगा टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. कचऱ्यापासून वीजनिर्मिती हा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प आहे. 700 मेगा टन सुक्या कचऱ्यापासून 14 मेगावॅट वीजनिर्मिती करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 12 मेगावॅट तयार झालेली वीज पालिका वापरणार आहे. हा प्रकल्प डीबीओटी तत्वावर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप नुसार ऍन्थोनी लाराकंपनीमार्फत विकसित केला आहे. 21 वर्षे कालावधीसाठी चालविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 300 कोटी रुपये खर्च झालेला आहे.
वॉटर ट्रीटमेंट, मैला शुद्धीकरणासाठी वीज
वेस्ट टू एनर्जी प्रकल्प तयार होणारी वीज मनपाच्या वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट आणि मैलाशुद्धीकरण केंद्रांसाठी वापरण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी चिखली मैलाशुद्धीकरण केंद्रामध्ये प्रक्रिया केलेल्या पाण्यावर टर्शरी ट्रीटमेंट करून 5 एम.एल.डी पाणी वापरण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे महापालिकेच्या वीज बिलात सुमारे 35 ते 40 टक्के बचत होणार असल्याचा दावा आयुक्त सिंह यांनी केला आहे.