पिंपरी, दि. 29 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत पिंपरी-चिंचवड शहरात कॉपीचा एकही प्रकार घडला नसल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिली आहे. त्यामुळे राज्यात कॉपीची 113 तर पुणे विभाग कॉपी प्रकरणात दुसऱ्या स्थानी असताना पिंपरीत कॉपीचा एकही प्रकार घडला नसल्याने शहरात कॉपी मुक्त अभियान पास झाले आहे.
दहावीचा 25 मार्चला शेवटचा पेपर झाला. त्यानंतर राज्यभरातील विविध विभागात झालेल्या कॉपी मुक्त अभियानाची चर्चा होऊ लागली आहे. राज्यात दहावीच्या परीक्षेत 113, तर बारावीच्या परीक्षेत 260 अशी एकूण 373 कॉपीची प्रकरणे आढळली. तसेच प्रश्नपत्रिकांमधील चुका, पेपरफुटीची प्रकरणे, कॉपीची प्रकरणे यांचा समावेश आहे. या प्रकरणांत गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. औरंगाबाद विभागात कॉपीची तब्बल 102 प्रकरणे घडली असून हा विभाग अव्वल ठरला आहे. त्यापाठोपाठ पुणे विभाग कॉपी प्रकरणात दुसऱ्या स्थानी आहे. कोकण विभागात मात्र कॉपीचे एकही प्रकरण आढळून आलेले नाही. यामुळे राज्य शासनाने गाजावाजा करुन सुरू केलेल्या कॉपीमुक्त अभियानच नापास झाल्याची राज्याची स्थिती असताना पिंपरी-चिंचवड शहरात एकही कॉपीचा प्रकार घडला नाही.
पिंपरी-चिंचवड शहरात 46 केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली. खासगी व महापालिकेच्या शाळेतील एकूण 33 हजार 587 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. शहरातील एकाही केंद्रावर कॉपीचा प्रकार घडू नये, यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने उत्तम नियोजन केले होते. त्यानुसार पेपरच्या दिवशी 5 जणांची दोन फिरती पथकेही नेमण्यात आली होती. त्यामुळेच कॉपी मुक्त अभियान यशस्वी झाले आहे.
राज्य सरकारने कॉपी मुक्त अभियान राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहरातील सर्व केंद्रावर योग्य त्या उपाय योजना करण्यात आल्या. त्यामुळे शहरातील एकाही केंद्रावर कॉपीचा प्रकार घडला नाही.
– संजय नाईकडे, शिक्षणाधिकारी, पिंपरी मनपा