बोपखेल – पिंपरी-चिंचवडमधील सर्व कारखान्यांना घनकचरा व दूषित पाणी यांचे शुद्धीकरण करण्याची यंत्रणा सुरु करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी पिंपरी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी दिलीप खेडकर यांना दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड व पुणे परिसरामध्ये नागरिकांना वाढत्या प्रदूषणाचा सामना करावा लागत असून प्रदुषणामुळे व हवामान बदलामुळे विविध आजारांचा सामना करावा लागत आहे.
वन्यजीव वन्यप्राणी व वनस्पती यांना देखील वाढत्या प्रदूषणाचा धोका तयार झाला आहे. दूषित पाण्याचे शुध्दीकरण करुनच त्यांची विल्हेवाट लावणे आवश्यक असताना कारखाने व उद्योग हे आर्थिक बचत करण्यासाठी कुठल्याही शुध्दीकरण प्रक्रियेशिवाय हे पाणी थेट नदी-नाल्यात सोडून देतात. त्यामुळे जीवसृष्टी व पर्यावरणाची हानी होत आहे. तसेच नागरिकांना त्वचा विकार, श्वसनाचे आजार तसेच कर्करोग यांचे प्रमाण वाढले आहे.
याबाबत त्वरित कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना युवती सेनाधिकारी प्रतीक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके, उपविभाग संघटक सनी कड, ओंकार जगदाळे, रवी नगरकर, नंदकुमार देवकर उपस्थित होते.