पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुन्हा एकदा जाहीर प्रकटन करत झाडांना इजा पोहचविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. परंतु पालिका प्रशासनाचा आजपर्यंतचा इतिहास पाहता नक्की कारवाई होणार की परत कागदी घोडेच नाचविले जाणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकरांनी देखील कारवाईचे आदेश
काढले होते, परंतु कोणतीही विशेष कारवाई झाली नाही.
सुमारे चार ते पाच वर्षांपूर्वी आंघोळीची गोळी नावाच्या संस्थेने देशाच्या अनेक शहरांमध्ये खिळेमुक्त झाड, आळेयुक्त झाड हे अभियान चालविले होते. या अभियानात आबालवृद्ध सहभागी झाले होते. अनेक महिने चाललेल्या या अभियानात आबालवृद्ध सहभागी झाले होते आणि शहरातील हजारो झाडाच्या बुंध्यातून खिळे, तारा काढण्यात आल्या होत्या. या अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळत असलेला पाहून पालिका प्रशासनाने देखील झाडांना खिळे मारुन जाहिरात करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश काढले होते. परंतु हे आदेश कागदी घोडे ठरले. कारवाई होत नसल्याने दुखावलेल्या वृक्षप्रेमींनी पालिकेकडून मिळालेले पुरस्कार देखील परत केले. एवढे होऊनही पालिका प्रशासन ढिम्मच राहिले होते. आता पुन्हा शहरातील अनेक झाडांच्या बुंध्यात खिळे रुतले असून त्यावर फुकटच्या जाहिराती झळकत आहेत.
आता पालिकेने पुन्हा जाहीर प्रकटन करत झाडांना हानी पोहोचविणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर कायदेशीर करवाई केली जाणार असल्याचे सांगितले आहे. तसेच नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचे आवाहन केले आहे. शहरात लाखो लहान-मोठी झाडे आहेत. त्यातील अनेक झाडे खूप जुनी आणि विशालकाय आहेत. पिंपरी-चिंचवडकरांना प्राणवायू देणाऱ्या या झाडांच्या बुंध्यात मात्र फुकटे जाहिरातदार खिळे मारुन आपल्या जाहिराती लटकवितात. काही जण लोखंडी तारेने जाहिरातीसोबत झाडांचा बुंधा घट्ट बांधतात. वृक्षाची वाढ होत असताना ही तार त्या बुंध्यात रुतत जाते. याचा झाडांना त्रास होतो.
रस्ते, केबल, बांधकाम, पाइपलाइन आदी कामांसाठी अडसर ठरल्यास झाडे सर्रास तोडली जातात. काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या उद्यानातील झाडे चोरांनी तोडून नेली. तर, रस्त्यातील झाडे देखील काहींनी तोडली आहेत. मुळात झाडांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. परंतु त्यांचे संगोपन आणि संवर्धन ही सर्वांचीच जबाबदारी असल्याचे लक्षात घेतले जात नाही.
झाडांना इजा पोहचविण्याचे प्रकार टाळण्यासाठी उद्यान व वृक्ष संवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य मालमत्ता विरुपणास प्रतिबंध कायदा 1995 कलम 3 नुसार झाडांची कत्तल अथवा झाडांना इजा पोहचविणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करणार आहे. या कायद्यानुसार तीन महिने कारावास आणि 2000 रुपये दंड अशी शिक्षेची तरतूद आहे. झाडांची कत्तल करणे अथावा झाडांना इजा पोहोचविणाऱ्या व्यक्तीला कडक शासन होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यापासून स्वतःला परावृत्त ठेवावे, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी जाहीर प्रकटनाद्वारे केले आहे.
खिळेमुक्त झाड अभियान राबवित हजारो झाडांचे खिळे आणि तारा काढल्या. पिंपरी-चिंचवडकरांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. पालिकेने साडे तीन वर्षांपूर्वी आम्हाला आश्वस्त केले होते, की झाडांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई करु, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. पालिकेने ही बाब गांभिर्याने घेण्याची गरज आहे.
– माधव धनवे-पाटील, संस्थापक अध्यक्ष, आंघोळीची गोळी.