पिंपरी – पवना आणि इंद्रायणी नदीला जोडणारे लहान मोठे बरेचसे ओढे-नाले गायब झाले आहेतच. मात्र, आता पवना नदीचे पात्रच बुजविण्याचे काम सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पिंपरीगाव पूल व काळेवाडीतील नदी समांतर 18 मीटर डीपी रस्त्याजवळ असलेले नदीपात्र राडारोडा टाकून बुजविले जात आहे. उघडपणे सुरू असलेल्या या प्रकाराकडे महापालिका डोळेझाक करत असल्याने महापालिका झोपेत आहे. का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वाढत्या शहरीकरणामुळे नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्याचा दुष्परिणाम शहरात वेळोवेळी आलेल्या महापुराच्या घटनेतून सर्वांनीच अनुभवला आहे. मात्र, त्या घटनेतून कोणत्याच शासकीय यंत्रणांनी धडा घेतल्याचे दिसत नाही, काळेवाडी, रहाटणी परिसरात निर्माण होणारा राडारोडा मागील अनेक महिन्यांपासून थेट पवना नदीत आणून टाकला जात आहे. यामुळे कचरा, बांधकामातील राडारोडा, दगडधोंडे, तुटलेल्या फरशा आदी वस्तूंचा भलामोठा ढिगारा नदी पात्रात तयार झाला आहे. काही दिवसांनी जेसीबी मशिनच्या माध्यमातून रातोरात हा ढिगारा सपाट केला जाईल, त्यामुळे साहजिकच नदीचे पात्र अजून अरुंद होईल. दरम्यान, सुट्टीच्या दिवशी किंवा सकाळी लवकर, सायंकाळी व रात्री याठिकाणी मोठ्याप्रमाणात राडारोडा टाकला जातो. थेट नदीचे पात्र बुजविण्याचे धाडस महापालिका अधिकाऱ्यांच्या मदतीनेच होऊ शकते. अशी शक्यता वर्तवली जात आहे.
नदी किनारी किंवा पात्रालगत टाकण्यासाठी वाहून आणला जाणारा राडारोडा क्रमांक नसलेल्या वाहनांतून आणला जातो. त्यामुळे नियोजनबद्ध नदी बुजविण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येते. महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस व मोटार वाहन विभागाने तातडीने लक्ष घालून पवना नदी वाचवावी. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.