पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील आगीच्या घटनांत बळी जाणार्यांची संख्या वाढत चालली आहे, या मृत्यूंना प्रशासनच जबाबदार आहे. आणखी किती बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का, असा खडा सवाल ज्येष्ठ माजी नगरसेविका आणि स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी केला आहे.
सीमा सावळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, तळवडे, रुपीनगर आणि आता वाल्हेकरवाडी येथील निष्पाप नागरिकांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याच्या सर्व घटनांचा आढावा घेतला तर महापालिका प्रशानावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची गरज आहे. शहरातील 70-80 टक्के अास्थापनांमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा आजही नसल्याचे वारंवार उघडकीस येऊनही प्रशासन बघ्याची भूमिका घेणार असेल तर, जन आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही सीमा सावळे यांनी दिला आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात सीमा सावळे म्हणतात, पूर्णानगर येथील दुर्घटनेनंतर शहरात आग प्रतिबंधक यंत्रणा किती आस्थापनांकडे आहे किंवा अशी दुर्घटना घडली तर काय तजवीज आहे याबाबत सर्वेक्षण करण्याची मागणी दोनवेळा महापालिका प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार बर्यापैकी पाहणीचे काम झाले, पण ज्यांच्याकडे आग प्रतिबंधक यंत्रणा उपलब्ध नाही अशा एकावरही कारवाई केलेली नाही.
बहुःतांश किराणा, मिठाईच्या दुकानांमध्ये आणि हॉटेल्समध्ये बेकायदा पोटमाळे तयार करून कामगारांच्या निवासाची सोय केली जाते. कामगारांच्या निवासाची स्वतंत्र व्यवस्था पाहिजे मात्र पैसे वाचविण्यासाठी पोटमाळ्यांचाच वापर केला जातो. पोटमाळ्यावर बिर्हाड करणार्यांवर अजून कारवाई झालेली नाही. आणखी किती बळी घेणार आहात, असा रोखठोक सवाल सिमा सावळे यांनी केला आहे.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा
प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्त शेखर सिंह, अग्नि प्रतिंबधक विभाग प्रमुख, अवैध बांधकाम नियंत्रण विभाग प्रमुख म्हणून संबंधित प्रभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता, बीट निरीक्षक यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणीही सावळे यांनी केली आहे.