निगडी – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्ये सध्या पाऊस बंद झाल्याने रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. त्यासाठी ठेकेदार नियुक्त केले आहेत. परंतु ठेकेदार काम करताना कामगारांच्या सुरक्षेकडे कानाडोळा करताना दिसून येत आहेत. परंतु महापालिका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने ठेकेदारांचे चांगलेच फावत आहे. परिणामी कामगार जीवावर उदार होऊन काम करताना दिसून येत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत विविध विकासकामे सुरू आहेत. परंतु महापालिकेकडील बहुतांश ठेकेदार त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षा साधने पुरवत नाहीत. त्यामुळे ठेकेदारांकडे काम करणारे बहुतांश कामगार जीवावर उदार होऊन सुरक्षासाधनांशिवाय कामे करत आहेत. त्यामुळे कामगाराला अपघात घडल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संभाजीनगर, चिंचवड प्रवेशद्वाराजवळ वाहनांची मोठी वर्दळ असते. या रस्त्यावर रोटरी क्लब, ठाणे जनता बॅंक आणि वेदांत हॉस्पिटल सारखे व्यावसायिक इमारती असल्यामुळे जड वाहने तसेच सार्वजनिक वाहनांची सारखी वर्दळ असते. त्या ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण व दुरुस्तीची कामे महापालिकेच्या संबंधित विभागाकडून करून घेतले जात आहे. मात्र कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेणे, कामगारांना सुरक्षा साहित्ये पुरविणे, ही संबंधित विभागाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांची व काम घेणाऱ्या कंत्राटदाराची जबाबदारी असताना यांनी मात्र सोयीस्कररित्या सुरक्षा नियमांकडे पाठ फिरविल्याचे दिसते. शिवाय रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे विकास कामांना अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण होणे शक्य नाही यासाठी कोणतीही उपाययोजना केलेली दिसत नाही. अशीच परिस्थिती शिवतेजनगर, चिंचवड येथील स्विमिंग टॅंकजवळ आढळून आली.
कामाच्या ठिकाणी चौकशी केली असता ठेकेदाराचा अभियंता व महापालिकेचा कोणताही संबंधित अधिकारी उपस्थित नव्हता. रस्त्याच्या अर्ध्या भागातूनच वाहतूक चालू होती. परंतु वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी बॅरिकेट्स लावलेले नव्हते.
नियमांची होतेय पायमल्ली
महापालिका प्रशासनाने बनविलेले कामगार कायदे व सुरक्षा नियमावली ठेकेदारांकडून धाब्यावर बसविली जात आहे. असे सर्रास चित्र शहरात सुरू असलेल्या अनेक विकासकामांवर प्रकर्षाने दिसून येते. मात्र या विरोधात अशिक्षित कामगारांनी आवाज उठविल्यास कामगारांना कामावरून कमी करण्याची शक्यता जास्त असते. यामुळे कामगारांना व त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे काम फक्त कागदावरच राहिल्याचे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही.