राजगुरुनगर – आरक्षण मिळत नाही तोपर्यंत खेड तालुक्यात यात्रा, उत्सव साजरे केले जाणार नाहीत व त्यामध्ये आकर्षण असलेल्या बैलगाडा शर्यती होणार नाहीत. असा महत्वपूर्ण निर्णय खेड तालुका बैलगाडा संघटना, अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांनी घेतला आहे.
खेड तालुका मराठा मोर्चा च्या वतीने मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा म्हणून गेली 6 दिवसांपासून खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या 4 युवकांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणास विविध संस्था संघटना कामगार संघटना यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.
अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण टाकळकर, साहेबराव गाढवे, विश्वास बुटे पाटील, अमोल बहिरट, माऊली पिंगळे, बाळासाहेब मांजरे, माणिक भोगडे यांच्यासह बैलगाडा मालक यांनी उपोषण करणाऱ्या अंकुश राक्षे, मनोहर वाडेकर, विकास ठाकूर, अजय स्वामी यांची भेट घेत त्यांना पाठिंबा देत हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले.
दरम्यान चाकण एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या महिंद्रा ऍण्ड महिंद्रा राईज कंपनीच्या कामगारांनी उपोषणस्थळी थांबून पाठिंबा दिला.