पिंपरी – 2011 च्या जनगणेनुसार पिंपरी-चिंचवड शहराची 17 लाख लोकसंख्या असून या लोकसंख्येनुसार शहरात दोन टक्के फेरीवाले म्हणजे 34 हजार 554 गृहीत धरण्यात आले आहे. त्यानुसार केंद्र सरकारने महापालिकेला या सर्व फेरीवाल्यांना पीएम स्वनिधीचा लाभ देण्याचे उदिष्ट दिले आहेत. पालिकेने आत्तापर्यंत 16 हजार 56 फेरीवाल्यांना स्वनिधीचा लाभ मिळवून दिला आहे.
केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयातर्फे नुकतीच अहमदाबाद येथे चार राज्यातील महापालिकांची कार्यशाळा झाली. या कार्यशाळेला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्यासह अर्थ विभागाचे सचिव, विविध बॅंकांचे व्यवस्थापक, पिंपरी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, समाज विकास विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर उपस्थित होते.
शहरी भागातील फेरीवाल्यांचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. 2020 मध्ये सरकारने फेरीवाल्यांसाठी पीएम स्वनिधी ही योजना आणली. या योजने अंतर्गत फेरीवाल्यांना प्रथम 10 हजार, दुसऱ्यांदा 20 हजार आणि कर्जाची वेळेवर परतफेड केल्यानंतर तिसऱ्यावेळी 50 हजार रूपयांचे असे अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. या कर्जाची केंद्र सरकार हमी घेत आहे. फेरीवाल्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागतो. तसेच पालिकेचे शिफारस पत्र आणि आधार कार्ड या कागदपत्रांवर सहज कर्ज मिळत आहे. त्यानुसार पालिकेने शहरातील 25 हजार 85 फेरीवाल्यांना कर्जासाठी शिफारस पत्रे मंजूर केली आहेत. आत्तापर्यंत 13 हजार 569 जणांना 10 हजार, 2 हजार 385 जणांना 20 हजार तर 102 जणांना 50 हजार अशा 16 हजार 56 जणांना पीएम स्वनिधीचा लाभ दिल्याची माहिती उपायुक्त चारठाणकर यांनी दिली.
फेरीवाले 19 हजार उदिष्ट; मात्र 34 हजारांचे
महापालिकेच्या भूमी आणि जिंदगी विभागाने शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले आहे. यामध्ये सुमारे 19 हजार फेरीवाले असल्याचे समोर आले. असे असताना केंद्र सरकारने लोकसंख्येच्या मानांकनानुसार 34 हजार 554 फेरीवाले आहेत, असे गृहित धरून त्यांना पीएम स्वनिधीचा लाभ देण्याची सूचना केली आहे. एखादी व्यक्ती मार्केटमध्ये अथवा रस्त्यावर भाजी विकत असेल तर त्यांनाही फेरीवाले म्हणूनच गृहित पीएम स्वनिधीचा लाभ देण्याच्या सुचना केंद्राच्या आहेत. 17 ऑगस्टपासून शहरातील बाजारपेठा, महाविद्यालय परिसर, समाज मंदिरात कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे.
महिला बचत गटांची मदत घेणार
फेरीवाल्यांना पीएम स्वनिधीचा लाभ मिळवून देण्यासाठी महिला बचत गटांची मदत घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रति लाभार्थी म्हणून 100 रूपये महिलेला देण्यात येणार आहेत.
शहराच्या लोकसंख्येनुसार केंद्र सरकारने 34 हजार 554 फेरीवाल्यांना पीएम स्वनिधीचा लाभ देण्याची सूचना केली आहे. आत्तापर्यंत 16 हजार 56 जणांना स्वनिधीचा लाभ मिळवून दिला आहे. उर्वरित उदिष्ट पूर्ण करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. येत्या तीन महिन्यात उदिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
अजय चारठाणकर, उपायुक्त, समाज विकास विभाग