पिंपरी – चिखली परिसरात रात्री-अपरात्री व अपुऱ्या केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याने महिलावर्गाची झोप उडविली आहे. या परिसरात दिवसा व मुबलक पाणीपुरवठा व्हावा, या मागणीसाठी या भागातील महिलांनी थेट महापालिका मुख्यालयावर धडक मारली. विकासभाऊ साने सोशल फाउंडेशनच्या वतीने महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेन देण्यात आले. यावेळी विकास साने यांच्यासह या भागातील महिला व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
चिखली परिसरातील नागरिकरणाने वेग घेतल्याने या भागातील पाण्याच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र, महापालिकेच्या वतीने या भागातील पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जात नसल्याने या बागातील महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या बागात रात्री-मध्यरात्री कितीही वाजता पाणीपुरवठा केला जात आहे. पहाटे दोन व तीन वाजता होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे महिलांना पाण्याची वाट पाहत जागे राहावे लागत आहे. अवेळी होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा वर्कींग वुमन्सला सर्वाधिक फटका बसत आहे.
आंदोलकांनी सांगितले की, अपुऱ्या व अवेळी होणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत विचारणा केली असता, महापालिका कर्मचाऱ्यांकडून महिलांना अरेरावीची भाषा केली जात आहे. विभागप्रमुखांबरोबरच आयुक्तांचा या विभागातील कर्मचाऱ्यांवर वचक राहिला नसल्याने हे कर्मचारी कोणालाही जुमानत नसल्याचे चित्र आहे. या भागात राहतोय म्हणजे गुन्हा केला की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या भागात राहणाऱ्या नागरिकांना पुरेसा व वेळेवर पाणीपुरवठा व्हावा, एवढी माफक अपेक्षा आहे. याबाबत विकासभाऊ साने सोशल फाऊंडेशनच्या वतीने महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाची दखल घेत, या भागातील पाणीपुरवठ्यात सकारात्मक बदल होईल, अशी आमची अपेक्षा आहे. – विकास साने, संस्थापक अध्यक्ष,विकासभाऊ साने, सोशल फाऊंडेशन.
राजकारणाचा फटका
गेली बारा वर्षांपासून काम करत असलेल्या कंत्राटी कामगारांचा नागरिकांना कोणताही त्रास होत नसायचा. त्यावेळी पाणीपुरवठ्याबाबत असलेल्या तक्रारींची संख्यादेखील कमी होती. मात्र, राजकीय वैमनस्यातून या कामागारांना कामावरून कमी करून, नव्याने नियुक्त केलेल्या कामगारांकडून पाणीपुरवठ्याबाबत मोठा त्रास होत असल्याची तक्रार या निवेदनात केली आहे.