– रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर – खेड तालुक्याची राजधानी असलेल्या राजगुरुनगर शहरात चार ठिकाणी बाजार भरतो. वर्षातील 365 दिवस दोन ठिकाणी दररोजचा बाजार भरतो. शुक्रवारी आठवडे बाजार भरतो. दरम्यान, शहरातील चारही बाजारात पुरेशा सुविधा नसल्याने बाजारात येणाऱ्या ग्राहकांची आणि बाजारात माल विक्री करणाऱ्या छोट्या-मोठ्या विक्रेत्यांची मोठी गैरसोय होत आहे. भाजी बाजारात गावडुकरे आणि भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. तर येथील आठवडे बाजारासह रोज भरणाऱ्या बाजारासाठी उपलब्ध असलेली जागा आता अपुरी पडत असल्याने पर्यायी जागेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
नगरपरिषदेच्या माध्यमातून दररोज प्रत्येक विक्रेत्याकडून 30 रुपये महसूल घेतला जातो मात्र, त्याबदल्यात सुविधा मिळत नाहीत. गाव डुकरे आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा बाजारात आवश्यक सुविधा द्याव्यात अशी मागणी किरण जाधव, संदीप अंकुश, नामदेव वालझडे, रेवण होले, नामदेव एरंडे, कैलास थिगळे संगीता तांबे, सुलाबाई भोर यांच्यासह भाजीपाला व्यावसायिकांनी केली आहे.
भाजी बाजार (नगरपरिषद परिसर)
राजगुरूनगर नगरपरिषदेला लागून असलेला आणि सकाळी 6 ते दुपारी 2 पर्यंत दररोज मोठा भाजी बाजार भरतो आहे. या बाजारात किरकोळ भाजी विक्रेत्यांसह जवळपासचे सर्व शेतकरी त्यांच्या शेतातील माल विकायला आणतात. या बाजारात भाजी विक्रेत्यांना बसण्यासाठी ओटे नाहीत;मात्र नगरपरिषदेने आखून दिलेल्या ठिकाणी भाजी विक्रेते बसतात. बाजाराची जागा अपुरी पडत आहे. नगरपरिषदेच्या दारापर्यंत कधी कधी हा बाजार येतो. न्यायालयाकडे जाणारा रस्ता येथून असल्याने या रस्त्यावर भाजी विक्रेते बसत असल्याने भाजी विक्रेते आणि ग्राहकांना त्याचा त्रास होतो. येथे पर्यायी जागा नसल्याने बाजारासाठी नगरपरिषदेपुढे मोठे आव्हान बनले आहे. या बाजारात आलेल्या महिलांचे दागिने, मोबाईल चोरीच्या मोठ्या घटना घडत आहेत. येथील बाजारात सीसीटीव्ही लावण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.
आठवडे बाजार (गढई मैदान)
खेड तालुक्यातील एक प्रमुख बाजार म्हणून राजगुरूनगरचा आठवडे बाजार प्रसिद्ध आहे. दर शुक्रवारी येथील आठवडे बाजार शहरातील गढई मैदानात भरतो. बाजारासाठी तालुक्यातील अनेक गावातील लोक येथे येतात. सर्वप्रकारचे व्यापारी या ठिकाणी त्यांचा माल घेवून येतात. येथील बाजार नेहमीच गजबजलेला असतो. येथे लाखो रुपयांची उलाढाल होते. मात्र, व्यापारी आणि ग्राहकांची संख्या पाहता ही जागा अपुरी पडत आहे. या आठवडे बाजारात आलेल्या विक्रेत्यांना रस्त्यावर बसावे लागते.
रोजचा भाजी बाजार (हौद ओढ्याजवळ)
दररोज सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत भरणारा शहरातील हा सर्वांत मोठा बाजार आहे. या बाजारात भाजीपाल्याची मोठी उलाढाल होते. भाजीपाला विक्रेत्यांचे येथे 118 ओटे आहेत. मात्र, ते अपुरे पडत आहेत. येथील भाजी बाजारात गाव डुकरे आणि भटक्या कुत्र्यांनी अड्डा बनवला आहे. अनेक पाटी धारक शेतकरी त्यांचा माल विकण्यासाठी बाजारातून शिरूर भीमाशंकर रस्त्यावरील पुलावर बसलेले दिसतात. अरुंद पूल आणि जड वाहनाची वाहतूक यात ते जीव मुठीत घालून ते भाजीपाला विकत असतात तर ते घेण्यासाठी ग्राहकही रस्त्यावर असल्याने मोठ्या अपघाताची भीती आहे.
मासे बाजार (जुना मोटार स्टॅंड)
राजगुरूनगर येथे जुना मोटार स्टॅंडवर प्रसिद्ध मासे बाजार आहे. हा बाजार भरत असलेली जागा खासगी मालकीची असल्याने तेथे सुधारणा करता येत नाहीत. पर्यायी जागा मिळण्यासाठी येथील मासे विक्रेत्यांचा संघर्ष सुरू आहे. 10 ते 15 मोठे मासे विक्रेते आणि असंख्य तालुक्यातील कोळी आणि कातकरी बांधव येथे मासे विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या बरोबरीने काही चिकन व्यावसयिक येथे आहेत. येथील मासे बाजारातील सुविधांचा मोठा अभाव असल्याने मासे विक्री करणाऱ्यांचे आणि ते विकत घेणाऱ्या ग्राहकांची येथेही गैरसोय होत आहे. बाजारात आलेल्या ग्राहकांना गाड्या पार्किंगसाठी जागा नाही. त्यामुळे सर्व वाहने या रस्त्यावर नाईलाजाने उभी केली जात असल्याने रस्त्यावर वाहनकोंडी होते. मासे बाजारात गाळे नसल्याने पावसात उन्हात नागरिकांना आणि मासे विक्रेत्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
मासे बाजार (जुना मोटार स्टॅंड)
राजगुरूनगर येथे जुना मोटार स्टॅंडवर प्रसिद्ध मासे बाजार आहे. हा बाजार भरत असलेली जागा खासगी मालकीची असल्याने तेथे सुधारणा करता येत नाहीत. पर्यायी जागा मिळण्यासाठी येथील मासे विक्रेत्यांचा संघर्ष सुरू आहे. 10 ते 15 मोठे मासे विक्रेते आणि असंख्य तालुक्यातील कोळी आणि कातकरी बांधव येथे मासे विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या बरोबरीने काही चिकन व्यावसयिक येथे आहेत. येथील मासे बाजारातील सुविधांचा मोठा अभाव असल्याने मासे विक्री करणाऱ्यांचे आणि ते विकत घेणाऱ्या ग्राहकांची येथेही गैरसोय होत आहे. बाजारात आलेल्या ग्राहकांना गाड्या पार्किंगसाठी जागा नाही. त्यामुळे सर्व वाहने या रस्त्यावर नाईलाजाने उभी केली जात असल्याने रस्त्यावर वाहनकोंडी होते. मासे बाजारात गाळे नसल्याने पावसात उन्हात नागरिकांना आणि मासे विक्रेत्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.