विश्रांतवाडी – पीएच.डी. विद्यार्थ्यांना सारथी संस्थेमार्फत दरवर्षी फेलोशिप देण्यात येते. सारथी, बार्टी व महाज्योती या तीनही संस्थांना समान न्याय असावे असे शासनाचे धोरण असताना बार्टीला वेगळा न्याय व सारथीला वेगळा न्याय कशासाठी, असा सवाल करत विद्यार्थी सोमवारपासून सारथी कार्यालयाबाहेर बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसलेले आहेत. या आंदोलनाला स्वराज्य पक्षातर्फे पाठिंबा देण्यात आला.
यावेळी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव, उपाध्यक्ष रघुनाथ चित्रे, राजू फाले, प्रतीक साखरे, विजय जरे, प्रवीण भोसले, विक्रम कदम, द्वारकेश जाधव, अजित बाबळसुरे, रोहित शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. बार्टीने पीएच.डी. विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी सीईटी परिक्षा रद्द करून सरसकट विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे सारथीने सुद्धा सरसकट १३२९ विद्यार्थ्यांना फेलोशिप द्यावी, अशी मागणी स्वराज्यच्या वतीने करण्यात आली. पक्षाचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांच्या दालनात ठिय्या मांडला.
“शासन सारथी, बार्टी व महाज्योतीला समान न्याय देण्याची भूमिका घेते. मग अधिकारी त्या निर्णयाचे पालन का करत नाहीत? जमत नसेल, तर खुर्ची सोडावी. अन्यथा स्वराज्य पक्ष विद्यार्थ्यांसाठी संघर्ष करायला तयार आहे.” – डॉ. धनंजय जाधव, सरचिटणीस, स्वराज्य पक्ष