मरकळ बाजारात दर वधारले : ट्रक चालकांच्या संपाचा परिणाम
चिंबळी: ट्रक चालकांचा संप असल्यामुळे मरकळ (ता. खेड) येथील मंगळवार (दि. 2)च्या आठवडे बाजारात तरकारी, पालेभाज्यांची आवक घटल्याने दर वधारले होते.
केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती करीत कायदे कठोर केले. त्यात खास करून अपघात ग्रस्ताला मदत न केल्यास 7 वर्षांची शिक्षा आणि 10 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या विरोधात ट्रक चालकांनी सोमवार पासून देशभरातील तीन दिवसाचा संप पुकारला आहे. याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर पडलेला आहे.
परिणामी मरकळ बाजारात तरकारी, पालेभाज्यांची आवक कमालीची घटल्याने दर वधारले होते. त्यामुळे बाजारात आलेल्या ग्राहकांचे बजेट कोलमडले होते. तसेच आसपाच्या गावातील ग्राहक आठ दिवसांचा भाजीबाजार खरेदी करतात; मात्र भाव वधारल्याने त्यांनी दोन ते तीन दिवसांचीच खरेदी केली होती.
सरकारच्या माध्यमातून संपावर तोडगा काढून जर चालकांचा संप मिटला नाही, तर आवक आणखी खाली येऊन भाजीपाल्यांचे दर दुपटीने वाढतील,त्यामुळे सरकारने यावर लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढून संप मिटावे अशी पावले उचलावीत असा सूर व्यापार्यांसह ग्राहकांचा आहे.
असे होते दर
आठवडे बाजारात बटाटा 30, कांदा 25, वांगी 120, टोमॅटो 40, गवार 120, मिरची 100, घेवडा 80, पावटा 100, दोडका 80, कारली 100, भेंडी 100, काकडी 40 रुपये किलो तर मेथी 25, कोथिंबीर 5 रुपये जुडीने विक्री करण्यात आली.