नवी दिल्ली – इलेक्ट्रिक वाहनांसह पर्यायी इंधनांनाही सरकार प्रोत्साहन देत आहे; परंतु पारंपरिक इंजिन असलेल्या वाहनांची नोंदणी थांबणार नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी स्पष्ट केले.
इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमात दूरदृकश्राव्य माध्यमातून सहभागी होत गडकरी यांनी हे स्पष्टीकरण दिले. गेले काही दिवस सरकार पेट्रोल आणि डीझेलवरील वाहनांचे उत्पादन विक्री बंद करणार असल्याची चर्चा होत होती. त्या चर्चेला पूर्णविराम देण्याच प्रयत्न गडकरी यांनी केला.
सरकार इलेक्ट्रिक वाहनांचा वेगवान अवलंब करण्याच्या बाजूने आहे. याशिवाय इथेनॉल, बायो-एलएनजी आणि ग्रीन हायड्रोजन यांसारख्या पर्यायी इंधनांचा वापरही सरकारला वाढवायचा आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. ज्वलनशील इंधनावर चालणाऱ्या वाहनांची नोंदणी थांबवणार नाही. मला वाटते की, आम्हाला कशाचीही सक्ती करण्याची गरज नाही, असे म्हणाले.
लोक इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत असून या वाहनांची विक्रीही वाढली आहे. सुमारे 250 स्टार्टअप ई-वाहनांच्या विकासामध्ये गुंतले आहेत याकडे लक्ष वेधून गडकरी म्हणाले, भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती कमी होतील. ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील इंधन आहे. मी स्वतः पुढील महिन्यात हायड्रोजनवर चालणारी कार खरेदी करणार आहे. विमानात वापरल्या जाणाऱ्या इंधनात 50 टक्के इथेनॉल वापरण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
पेट्रोल डीझेलचा वाढत्या किमती आणि गाड्यांमधून होणाऱ्या प्रदूषणामुळे इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा ओढा वाढला आहे. भारत सरकारही इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे.
त्याचबरोबर जुनी वाहने आणि पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारने नवीन नियम आणि कायदे अस्तित्वात आणले आहेत. व्हेईकल स्क्रॅप पॉलिसीही लागू आहे. त्यामुळे पेट्रोल-डीझेलवरील वाहनांचे उत्पादन बंद करण्याची सूचना त्यांनी केली.