सत्यजित रे यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष. त्यांचा जन्म पश्चिम बंगालमधील कलकत्त्यात 2 मे 1921 रोजी झाला. ते शांती निकेतनात पाच वर्षे राहिले. 1943 सालात ते पुन्हा कलकत्त्याला आले. या काळात त्यांची रुची चित्रकला नि अनुषंगिक विषयात वाढली असावी. कारण इथे येऊन त्यांनी ग्राफिक डिझायनर म्हणून कामाला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी अनेक प्रसिद्ध पुस्तकांची मुखपृष्ठे चितारली. यात जिम कार्बेट या वन्य अभ्यासकाचे “मॅन इटर्स ऑफ कुमाऊँ’, जवाहरलाल नेहरूंचे “डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ यांचा समावेश आहे.
पुढे त्यांना विभूतीभूषण बांधोपाध्याय यांच्या 1928 मध्ये छापलेल्या विख्यात “पाथेर पांचाली’ या कादंबरीची बाल आवृत्ती तयार करण्यात महत्त्वाची भूमिका मिळाली. तिचे नाव होते “अम अंतिर भेपु (आंब्याच्या बाठीची शिटी). खुद्द रे सुद्धा या पुस्तकाने प्रभावित झाले होते. त्यांनी या पुस्तकासाठी काढलेली अनेक रेखाचित्रे त्यांना, त्यांचा पहिला नि प्रसिद्ध चित्रपट पाथेर पंचालींचे शॉट्स म्हणून उपयोगात आले.
एकूण त्यांचा हा साधारण तीस वर्षांचा कालखंड पाहता ते चित्रपट क्षेत्राकडे वळतील असे कोणाला काय त्यांनाही वाटले नसेल.
त्यासाठी 1949 साल उजडावे लागले. त्याचं झालं असं या वर्षी फ्रान्सचे दिग्दर्शक जां रेनॉ आपल्या “द रिव्हर’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या स्थळांच्या शोधात कलकत्त्यात आले नि त्यात मदत म्हणून रे सामील होते.याच काळात चर्चा करत असता रे हे उत्तम चित्रपट निर्माते-दिग्दर्शक होऊ शकतात असे त्यांनी बोलून दाखवले. यात रे यांनी मनन करण्यास सुरुवात केली, चित्रपट विचार सुरू झाले. त्यांना पुढच्याच वर्षी नशिबाने कंपनी कामानिमित्त लंडनला जाण्याची संधी आली. तिथे त्यांनी अनेक चित्रपट पाहिले.
1950 ला भारतात परतण्यापूर्वी त्यांच्या पाहण्यात “बायसिकल थिव्हस’ आला. त्याच्या कथेचा प्रभाव घोळवत त्यांनी प्रवासात “पाथेर पंचाली’चा आराखडा निश्चित केला. भारतात परतताच त्यांनी 1952 ला नवशिकावू उमेदवारांना हाताशी धरत चित्रीकरण चालू केले. निर्माता नवा असल्याने पैसे गुंतवण्यास कोणी तयार होईना. त्यांना स्वतःच्या खिशातून पुंजी टाकावी लागली; पण कालांतराने ते काम थांबवावे लागले. काही लोकांकडून त्यांनी पैसे उभारण्याचा प्रयत्न करून पाहिला.
अखेर पश्चिम बंगाल सरकारच्या मदतीने 1955 साली “पाथेर पांचाली’ पडद्यावर आला. आपल्या तीस वर्षांच्या काळात अथक परिश्रमाने तब्बल तीन डझन चित्रपटांची निर्मिती दिग्दर्शन केले. कंचनगंगा, महापुरुष, पारस पत्थर, महानगर, चारुलता, अपुर संसार, अपराजीतो, गुपी गायन-बाघा बायन यांचा समावेश आहे. 1977 सालात त्यांचा एकमात्र चित्रपट शतरंज के खिलाडी प्रदर्शित झाला. तर आगंतुक हा त्यांच्या कारकिर्दीतील (1991) शेवटचा चित्रपट ठरला. 1985 मध्ये त्यांना सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. 1992 साली त्यांना भारतरत्न देऊन गौरवण्यात आले. 23 एप्रिल 1992 रोजी त्यांची हृदय विकाराने प्राणज्योत मालवली.
विनय खरे