नवी दिल्ली : भारतात गुजरातमध्ये मिठाचे सर्वाधिक उत्पादन होते आणि त्याच्या जोरावर आज भारत अमेरिकेसह जगातील 76 देशांची मिठाची गरज भागवतो आहे. भारतातील मीठ उत्पादन, विक्री व निर्यातीवर नियंत्रण ठेवणाऱ्या सॉल्ट कमिशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार जगात मिठाच्या उत्पादनात चीन आणि अमेरिकेपाठोपाठ भारत तिसऱ्या स्थानावर आहे.
सध्या भारतातून 16 हजार टन मिठाची अमेरिकाला दरवर्षी निर्यात केली जाते. जगात दरवर्षी 2300 लाख टन मिठाचे उत्पादन होते. त्यामध्ये भारताचा हिस्सा जवळपास 265 लाख टनांचा आहे. भारतातील 96 टक्के मिठाचे उत्पादन गुजरात, तमिळनाडू आणि राजस्थान या तीन राज्यातून होते.
भारतात मागील वर्षी 78.80 लाख टन मिठाची निर्यात केली होती. त्यातील 75 टक्के वाटा हा एकट्या गुजरातचा होता. गुजरातमध्ये देशात सर्वाधिक मिठाचे उत्पादन होते. त्यामुळे स्वाभाविकपणे निर्यातीतही गुजरातचा मोठा वाटा आहे. त्याबरोबरच गुजरातमध्ये उत्पादित मिठाची गुणवत्ता अन्य राज्यातील मिठापेक्षा सरस असते.
राज्यातील जामनगर, मीठापूर, लावणपूर, झाखर, भावनगर, चैरा, राजुला, गांधीधाम, कांधला आणि मलिया ही मीठ उत्पादनाची प्रमुख ठिकाणे आहेत. भारतात उत्पादित होणाऱ्या मीठापैकी 70 टक्के मीठ समुद्राच्या पाण्यापासून मिळवले जाते. उरलेले 28 टक्के मीठ जमिनीतील समुद्राचे पाणी आणि झऱ्यांमधील कडे आणि दगडांवर साठलेल्या लवणापासून उत्पादित केले जाते. सेंधव मीठ हे हिमाचल प्रदेशातील कडेकपाऱ्यांतून मिळवले जाते.
मिठाच्या निर्यातीत गुजरातचा वाटा 76.7 टक्के, तमिळनाडूचा 11.16 टक्के, राजस्थानचा 9.86 टक्के आणि अन्य राज्यांचा 2.28 टक्के आहे. भारतातून मिठाची आयात करणारे प्रमुख देश (आकडे लाख टनामध्ये, सॉल्ट कमिशन ऑफ इंडियाची माहिती)
* नेपाळ – 205.6
* दुबई -13.29
* सिएरालिओन – 10.98
* लायबेरिया- 7.88
* ओमान -7.39
* झिम्बाब्वे-5.42
* कतार – 4.43