नवी दिल्ली – पेगॅसस प्रकरणात जो गौप्यस्फोट झाला आहे त्याविषयी सरकार मौनात गेले आहे. सरकारचे हे मौन म्हणजे गुन्ह्याचीच कबुली आहे अशी प्रतिक्रिया डाव्या पक्षांनी दिली आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी म्हटले आहे की, मोदी सरकारने हे स्पायवेअर कशासाठी खरेदी केले आणि त्याच्या वापरासाठी कोणाची अनुमती घेतली ही माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केली पाहिजे. हे स्पायवेअर कोणाच्या विरोधात वापरले गेले आणि त्यातून मिळालेली माहिती कोणाला पुरवली जात होती यावरही खुलासा झाला पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे.
कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा यांनी म्हटले आहे की, सरकारने या प्रकरणातील सत्य दडपले होते आता त्यावर त्यांनी उत्तर दिले पाहिजे. या प्रकरणात सरकार जे मौन बाळगून आहे त्याचा अर्थ त्यांच्याकडून गुन्ह्याची कबुलीच दिली गेली आहे असेही त्यांनी म्हटले आहे.