संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयामध्ये उभारणार स्मारक भिंत
नवी दिल्ली – शहीद शांतता सैनिकांच्या सन्मानार्थ संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात स्मारक भिंत उभारण्यासाठी भारताने मांडलेल्या ठरावाचा मसुदा संयुक्त राष्ट्र महासभेने मंजूर केला आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी बुधवारी यूएन जनरल असेंब्लीच्या सभागृहात शहीद झालेल्या संयुक्त राष्ट्र शांती सैनिकांसाठी “मेमोरियल वॉल’ उभारण्यासाठीच्या प्रस्तावाचा मसुदा ठराव सादर केला. हा ठराव जवळपास संयुक्त राष्ट्राच्या 190 सदस्य देशांनी सहप्रायोजित केला होता आणि सर्वसंमतीने तो स्वीकारण्यात आला होता.
न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात योग्य आणि प्रमुख ठिकाणी मृत शांती सैनिकांच्या स्मरणार्थ स्मारक भिंत स्थापन करण्याच्या सदस्य राष्ट्रांच्या पुढाकाराचे या ठरावात स्वागत करण्यात आले आहे. या ठरावात या स्मारक उभारणीच्या पद्धतींचा योग्य विचार केला गेला आहे, या स्मारक भिंतीवर “ज्यांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे, अशा शांती रक्षकांची नावे नोंदवण्यात येणार आहेत.
“स्मारकाची भिंत संयुक्त राष्ट्रांनी शांतता राखण्यासाठी दिलेल्या महत्त्वाची साक्ष ठरेल.’ असे ठरावाची माहिती देताना कंबोज म्हणाल्या. हा ठराव बांगलादेश, कॅनडा, चीन, डेन्मार्क, इजिप्त, फ्रान्स, भारत, इंडोनेशिया, जॉर्डन, नेपाळ, रवांडा आणि अमेरिकेसह 18 देशांनी सादर केला होता. या ठरावाला संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
“शांती रक्षकांच्या सन्मानार्थ नवीन स्मारक भिंत उभारण्याच्या भारताने मांडलेल्या ठरावाला संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने मंजुरी दिल्याबद्दल आनंद होत आहे. या ठरावाच्या बाजूने विक्रमी 190 मते पडली. सर्वांच्या पाठिंब्याबद्दल आम्ही आभारी आहोत.’
नरेंद्र मोदी, पंतप्रधान