संतोष पवार
सातारा – राज्यातील सत्तानाट्याच्या घडामोडी दिवसेंदिवस वाढत असून, शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या समर्थकांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. या घडामोडींचा मोठा परिणाम जिल्ह्यात दिसत आहे. शिवसेनेत सध्या मूळ शिवसेना व बंडखोर आमदार समर्थक अशी दुफळी दिसत आहे, तर दोन्ही कॉंग्रेसमध्ये कमालीची शांतता आहे. सत्ता टिकणार की जाणार याचीच चिंता त्यांना आहे. भाजप मात्र “वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहे. भाजपची सत्ता आल्यास कोण मंत्री, कोण पालकमंत्री होणार याची चर्चा आहे.
शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. शिवसेनेच्या 55 पैकी 40 आमदार शिंदे यांच्या गटात सामील झाल्याने सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकते. शिंदे यांच्या गटात ना. शंभूराज देसाई व आ. महेश शिंदे सहभागी झाल्याने जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. हे बंड टिकणार की मोडीत काढण्यात महाविकास आघाडीला यश येणार, याची उत्सुकता आहे. शंभूराज देसाई यांना गृह राज्यमंत्रिपदाबरोबर अन्य विभागांचा पदभार देण्यात आला. महेश शिंदे यांनी कोरेगाव-खटाव मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांचा पराभव केल्याने त्यांची राज्यात ओळख वाढली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडात जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्ही आमदार सहभागी झाल्याने कट्टर शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. साताऱ्यात शिवसैनिकांनी आंदोलन करून बंडखोर आमदारांचा निषेध केला असला, तरी शिवसेनेचे मोजके पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात दिसले. उर्वरित पदाधिकारी काय भूमिका घेणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रीय कॉंग्रेसच्या गोटात मात्र कमालीची शांतता आहे. पक्षसंघटना वाढवण्यासाठी दोन्ही कॉंग्रेसनी गेली अडीच वर्षे प्रयत्न केला. आता सरकार टिकले नाही, तर पुन्हा विरोधी बाकांवर बसायची वेळ येणार असल्याने पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समर्थकांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये चिंता आहे. दुसरीकडे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण असले, तरी ते “वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. राज्यातील सत्तानाट्याचा सर्व पक्षांवर काही अंशी परिणाम झाला असून, राजकारणापासून लांब राहणाऱ्यांनाही राज्यात सत्ता टिकणार की जाणार याचीच उत्सुकता आहे. सरकारबाबत गावोगावी पैजा लागत आहेत.
पालकमंत्री कोण याची उत्सुकता
बंड यशस्वी झाल्यास राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे गट यांचे सरकार सत्तेवर येईल. असे झाल्यास जिल्ह्यात कोणाला मंत्रिपदे मिळणार, याची चर्चा आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, शंभूराज देसाई, जयकुमार गोरे यांच्यापैकी कोण मंत्री, कोण पालकमंत्री होणार याची उत्सुकता आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे व शंभूराज देसाई यांच्यापैकी एकास पालकमंत्रिपद मिळेल, असे बोलले जात आहे. जिल्ह्याच्या वाट्याला कोणते महामंडळ येणार याचीही उत्सुकता आहे.