स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांवरील पूरक व्यवसाय डबघाईला
– सचिन खोत
पुणे – स्पर्धा परीक्षा केंद्राचे वर्कशॉप असलेल्या पुणे शहरातील विशेषत: सर्व पेठांमधील सर्व पूरक घटकांना लॉकडाऊननंतर जबर आर्थिक झळ बसली आहे. शहरात सुमारे दोन ते अडीच लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. यात एमपीएससी, यूपीएससी, बॅंकिंग, गेट, सीएच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मात्र, लॉकडाऊननंतर नोकरभरतीची अनिश्चितता वर्षभर राहणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनी घरचा रस्ता धरला आहे. निवास, हॉटेल, रूम, चहा, नाष्टा सेंटर, अभ्यासिका, पुस्तक खरेदी, क्लासच्या माध्यमातून दरवर्षी सरासरी 3300 कोटी रुपयांच्या उलाढालीवर पाणी फिरले आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांवर अवलंबून असणारी अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. 1995 पासून पुणे शहराची ओळख स्पर्धा परीक्षेचे केंद्र म्हणून झाली आहे. हे शहर राज्यातील एमपीएसी हब म्हणून नावारूपास आले. 2000 पासून शहरात राज्याच्या कानाकोपऱ्यातून परीक्षेची तयारी करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे सर्व पेठांचे अर्थकारण बदलले आहे. यात इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांची संख्या आहे. ही आकडेवारी दोन ते अडीच लाखांपर्यंत आहे.
प्रत्येक विद्यार्थ्यांला फक्त राहणे, जेवण, नाष्टा, चहा, मोबाइल रिचार्ज, दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा खर्च महिन्याकाठी आठ हजार रुपये येतो. वर्षाकाठी ही आकडेवारी 2 हजार 880 कोटी रुपयांपर्यंत जात आहे. सदाशिव, नारायण, शनिवार, रविवार, नवी पेठ आदी सर्व पेठा, कोथरूड, कर्वेनगर, पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थी राहतात.
भोजनालयांचा भटारखाना मंदावला
सर्व पेठांमध्ये सुमारे 300 ते 400 हॉटेल्स, नाश्ता सेंटर, चहा सेंटर्स आहेत. खऱ्या अर्थाने या व्यवसायाची भिस्त विद्यार्थ्यांवरच आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांचा होणारा खर्च जेवण, चहा, नाष्टा यावर होत आहे. यावर हॉटेल व्यवसायाची उलाढाल 800 ते 900 कोटी रुपये आहे. यावर सरासरी 1 हजार कामगार अवलंबून आहेत. हॉटेल व्यवसायाला साहित्य पुरवठा करणारे पूरक घटक आहेत. शहरात सुमारे 125 ते 150 अभ्यासिका आहेत. या अभ्यासिकांना महिन्याकाठी 50 हजार ते 1 लाख रुपये भाडे आहे. सुमारे 50 ते 1 लाख विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अभ्यासिका लावली आहे. यातून अभ्यासिका चालकांचे सरासरी 250 कोटींच्यावर नुकसान झाले आहे.
पुस्तक भांडार अडगळीत
स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे ज्ञानभांडार उघडणाऱ्या आप्पा बळवंत चौकातील पुस्तक दुकानांना फटका बसला आहे. या विद्यार्थ्यांवर अर्थव्यवस्था गतिमान झाली आहे. प्रत्येक विद्यार्थी हा 2 ते 3 हजार रुपयांचे वर्षाकाठी खरेदी करतो. वर्षभरात सरासरी 45 ते 50 कोटी रुपयांची उलाढाल अप्पा बळवंत चौकातील ज्ञानभांडारातून होत आहे.
क्लासचालकांचे भवितव्य अंधकारमय
शहरात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देणाऱ्या क्लासेसची संख्या 50 ते 60 आहे. यात दररोज तीनशे ते चारशे विद्यार्थ्यांपासून 10 हजारांवर विद्यार्थी मार्गदर्शन घेतात. प्रत्येक विद्यार्थ्यांमागे क्लासेसचे शुल्क 50 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत आकारले जात आहे. क्लासेसच्या माध्यमातून 125 ते 150 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. काही क्लासेस चालकांनी पदरमोड करून भाडे भरले आहे. तर काहीजणांनी आपला गाशा गुंडाळला आहे.