जामखेड -कर्जत – जामखेड तालुक्यातील दुष्काळ हे जुनं दुखणं आहे. या तालुक्यातील दुष्काळ पाहण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आल्या होत्या. त्यांनी येथील दुष्काळाची स्वत: पाहणी केली. मात्र दुर्दैवाने त्यावेळेपासून आजपर्यंत येथील दुष्काळ हटला नाही. पाण्याचा, उद्योगाचा प्रश्न सुटला नाही. अहिल्यादेवी होळकर यांनी सर्वांना पाणी मिळावे, यासाठी प्रयत्न केले, तसे रोहित पवार यांनी मतदार संघातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला. अहिल्यादेवींनी प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल असे प्रयत्न केले. त्याप्रमाणे रोहित पवारांनी मतदार संघात एमआयडीसी आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बैठक करून लवकरच एमआयडीसी आणणार आहे. अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदार रोहित पवार यांचे कौतूक केले.
जामखेड तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते.अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, आमदार रोहित पवार, आमदार नीलेश लंके, आमदार संग्राम जगताप, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, होळकरांचे वंशज भुषणसिंहराजे होळकर, बाळासाहेब आजबे, रामहरी रुपनर, अनिल गोटे, अक्षय शिंदे उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले, अहिल्यादेवींनी आपल्या आयुष्यात पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ठिकठिकाणी बारवं केली. त्यातून पाण्याची सुविधा केली. कर्जत-जामखेडमधील लोकांशी चर्चा केल्यानंतर इथल्या पाण्याचा प्रश्न समोर येतो. रोहित पवार यावर काम करत आहेत. अहिल्याबाईंचं दुसरं वैशिष्ट म्हणजे त्यांनी आपल्या राज्यात लोकांना काम दिलं. विणकरांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून माहेश्वरी कपडा, माहेश्वरी साडी संपूर्ण देशात प्रसिद्ध झाली, याची सुरुवात अहिल्यादेवींनी केली. आज अहिल्यादेवींचं स्मरण करताना रोहित पवारांनी इथं एमआयडीसी कशी होईल यासाठी बैठका घेतल्या.
तिसरी गोष्ट महत्वाची अहिल्यादेवींनी आपल्या राज्यात दळणवळणाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले. अनेक ठिकाणी त्यांनी रस्ते केले. रोहितनं जबाबदारी घेतल्यानंतर दोन महामार्ग मंजूर झाले. त्यामुळं रस्ते, पाणी, रोजगार आहे. जे अहिल्यादेवींनी चालू ठेवलं तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुमचा आमदार काम करतोय.
याला मनापासून आनंद होतोय. मला सर्वांना एकच विनंती आहे की, ही विकासाची गंगा या भागात येईल या कामात तुमचं सर्वांच सहकार्य सर्वांना मिळेल. आमदार रोहित पवार म्हणाले, शरद पवार यांनी केंद्रात आपले वजन वापरावे आणि मराठा तसेच धनगर आरक्षणाचा मार्ग सुकर करावा, अशी विनंती केली आहे. तसंच आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा वाढविण्यासाठी शरद पवार यांनी आपले वजन वापरून केंद्र सरकारकडे प्रयत्न करावेत. त्यामुळे मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्य मदत होईल, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
अहिल्यादेवी होळकर जयंतीसाठी पंचवीस लाख निधीः मुश्रीफ
अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांचे सर्वधर्म समभाव आणि समतेचे तत्व सर्वांना प्रेरणादायी आहे. त्यांच्या या शिकवणूकीची प्रेरणा आत्मसात व्हावी यासाठी दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची चोंडीत जयंती करण्यासाठी पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.
==================