भाजप, शिवसेनेचा विरोध कायम ः राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका गुलदस्त्यात
पवनानगर (वार्ताहर) – पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना जलवाहिनी प्रकल्प तब्बल 2011 पासून रखडला आहे. भाजप, शिवसेनेसह अन्य राजकीय पक्षांचा प्रकल्पाला विरोध असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची भूमिका गुलदस्त्यात असल्याचे वास्तवसमोर आले आहे. त्यामुळे प्रकल्पाची “वाट’ बिकट असल्याचे दिसून येत आहे. मावळ तालुक्यातील पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रश्न अनुत्तरिच आहे. राज्यासह तालुक्यात सत्तांतर झाल्याने जलवाहिनी होणार की नाही याकडे मावळसह पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष लागले आहे.
9 ऑगस्ट 2011 रोजी क्रांतिदिनी पवना बंदिस्त जलवाहिन्याच्या विरोधात केलेल्या आंदोलनात झालेल्या मावळ गोळीबारात तीन शेतकरी मृत पावले. या घटनेला रविवारी (दि. 9) नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. या प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्रांना विचारात न घेता पिंपरी-चिंचवड महापालिका हा प्रकल्प राबत होती. या विरोधात भारतीय जनता पार्टी, शिवसेना तसेच या भागातील स्थानिक पक्ष व शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यामध्ये तीन निष्पाप शेतकऱ्यांचा बळी गेला.
याशिवाय 200 हून अधिक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या नऊ वर्षांत बरेच पाणी पुलाखालुन गेले. यामध्ये ना जलवाहिनीचा रद्दचा निर्णय झाला ? आत्तापर्यंत मावळ तालुक्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता होती, तसेच 2014 ते 2019 पर्यंत भाजप-शिवसेनेची सत्ता या पाच वर्षांत सत्ताधारी नेत्यांनी व मंत्र्यांनी मावळात जलवाहिनीला विरोध, तर पिंपरी चिंचवडला गेले की बंदिस्त जलवाहिनीला समर्थन यामुळे नागरिक संम्रभात पडले. भाजपा-शिवसेना युतीची सत्ता असताना जलवाहिनीला राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही विरोध दर्शविला.
आता मावळ तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील शेळके हे निवडून आले, तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकारची सत्ता आली आहे, तसेच आमदार सुनील शेळके हे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे पवना बंदिस्त जलवाहिनीचा मार्ग सुकर होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. याला भाजप किती विरोध करते यावरच पवना बंदिस्त जलवाहिनीचा निर्णय अवलंबून राहणार आहे.
शिवसेना राज्यात सहभागी असले तरी सुद्धा पवना जलवाहिनीला विरोध कायम राहील, असा इशारा दिला आहे. यावरून पवना बंदिस्त जलवाहिनी रद्द होणार का मार्गी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका जाणून घेण्यासाठी आमदार सुनील शेळके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.
बंदिस्त पवना जलवाहिनीस शिवसेनेचा विरोध याआधी होता. यापुढे ही कायम असणार आहे. शिवसेना नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिली आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पाणी देण्यास आमचा विरोध नाही, पण बंदिस्त वाहिनीतून पाणी देण्यास विरोध कायम आहे. सत्तेत असू अथवा नसलो तरी आमची भूमिका कायम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आम्ही बंदिस्त जलवाहिनी रद्द करा म्हणून मागणी केली आहे.
– राजू खांडभोर, तालुका प्रमुख, शिवसेना.
मावळ गोळीबारात शहीद झालेले कांताबाई ठाकर, शामराव तुपे आणि मोरेश्वर साठे या तीन शेतकऱ्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. पवना बंदिस्त वाहिनीतून पाणी नेण्यास पहिल्यापासून भारतीय जनता पक्ष, शिवसेना, कॉंग्रेस आणि आरपीआय एकत्र येऊन जलवाहिनी प्रकल्पाला प्रखर विरोध करीत बंद पाडले. पवना बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द झाला पाहिजे, या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत.
– संजय ऊर्फ बाळा भेगडे, माजी राज्यमंत्री