गतवर्षी 18 हजारांहून अधिकजणांवर कारवाई; तर यंदा अवघ्या 33 जणांवर कारवाई
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातून तीन महामार्ग जातात. तसेच शहराच्या अंतर्गत भागातही बीआरटी मार्ग आणि ग्रेडसेपरेटर मार्ग, ठिकठिकाणी उभारण्यात आलेले उड्डाणपूल यामुळे प्रशस्त रस्त्यांचे जाळे विणले गेले आहे. गल्लीबोळातही सिमेंटचे चकाचक रस्ते झाले असून प्रत्येक रस्त्याला दुभाजकही आहेत.
दुभाजकामुळे वाढणारे अंतर कमी करण्याच्या हेतूने अनेक वाहनचालक एकेरी रस्त्यातूनच चुकीच्या पद्धतीने आपली वाहने सर्रासपणे दामटत असल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यानंतरही वाहतूक पोलिसांकडून याकडे दूर्लक्ष होत असून गेल्या चार महिन्यांत केवळ 33 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर गवर्षी याच कालावधीत 18 हजार 874 जणांवर कारवाई करण्यात आली होती.
पिंपरी-चिंचवड शहरातून पुणे-मुंबई, नाशिक पुणे आणि कात्रज-देहूरोड बायपास असे तीन महामार्ग जातात. तसेच अपघात टाळण्यासाठी अनेक ठिकाणी ठिकठिकाणी यू-टर्न घेण्यासाठी जागा ठेवलेली नाही. त्यामुळे थोड्याशा अंतरासाठी नागरिकांना वळसा घालून यावे लागते. मात्र, वेळ आणि इंधनाच्या रूपाने खर्च होणारा पैसा वाचविण्यासाठी वाहन चालक रॉंग साइडने आपली वाहने आणतात. त्यातच समोरून येणाऱ्या वाहनांचा वेग जादा असल्याने वारंवार अपघात होत आहेत.
करोनाच्या काळात वाहतूक मंदावली होती. तरीदेखील 2020 मध्ये शहरात तब्बल 284 प्राणांतिक अपघात झाले. त्यानंतर 2021 मध्ये अपघातात वाढ झाली. सन 2021 मध्ये 318 प्राणांतिक अपघाताची नोंद झाली आहे. तर यंदाच्यावर्षी 1 जानेवारी ते 30 एप्रिल 2022 या अवघ्या चार महिन्यांत 120 प्राणांतिक अपघात झाले आहेत. तर याच कालावधीत गेल्यावर्षी म्हणजे 2021 मध्ये 99 अपघात होते. अपघातांचे कारण म्हणजे वाहतूक पोलिसांकडून कमी झालेली कारवाई मानले जात आहे.
गेल्यावर्षी 2021 मध्ये जानेवारी ते एप्रिल या कालावधीत रॉंग साइडने येणाऱ्या 18 हजार 874 वाहनांवर कारवाई केली होती. मात्र यंदाच्यावर्षी याच कालावधीत केवळ 33 वाहनांवरच कारवाई झालेली आहे. पोलिसांचे हेच दुर्लक्ष अपघातांना कारणीभूत ठरत असून वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे सव्वादोन वर्षांत 722 नागरिकांना आपले जीव गमावावे लागले आहेत.
उपप्रादेशिक परिवहनचे दुर्लक्ष
महामार्गावर हायस्पीड वाहनांवर स्पीडगनच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. रॉंग साइडने येणाऱ्या वाहनांकडे पोलिसांकडून दुर्लक्ष केले जाते. वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागांकडून बेशिस्त वाहन चालकांवर जरब बसेल, अशी कारवाई होत नसल्याने चालकांकडून वाहतूक नियमांकडे सर्रास उल्लंघन केले जात आहे. रॉंग साइडने येणाऱ्या वाहनांवर कारवाई केल्यास अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होईल.