राजकीय भूमिका आज जाहीर करणार
– एम. एस. सुतार
बावडा – दोन्ही कॉंग्रेसकडून हर्षवर्धन पाटील यांचे खच्चीकरण गेल्या काही दिवसांपासून केले जात आहे. हे स्वतः पाटील यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांनाही चांगलेच अवगत होते. त्यामुळेच कार्यकर्त्यांची खदखद तर आधीच उफाळली होती, पण पाटील यांना खात्री होती की राष्ट्रवादीने शब्द पाळण्यास जरी नकार दिला तरी कॉंग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरुन काहीतरी चांगली गोड बातमी ऐकायला मिळेल पण चार दिवसांवर निवडणूक येऊन ठेपली तरीसुद्धा कॉंग्रेसच्या वरिष्ठांकडून कसलीही दखल घेतली जात नाही. हे लक्षात आल्यानेच पाटील यांनी 1995 चा इतिहास पुन्हा एकदा घडवण्यासाठी कंबर कसली आहे.
हर्षवर्धन पाटील 1995 आणि 1999 या दोन्ही विधानसभा निवडणुकीत अपक्ष आमदार म्हणून निवडून येऊन पण सत्तेत मंत्रीपद भूषवले होते. त्यानंतर ते कॉंग्रेसमध्ये सहभागी झाले अन् कॉंग्रेसला राज्यात मोठी बळकटी मिळवून दिल्याने त्यांनी 2014पर्यंत मंत्रीपद भूषविले. मात्र, 2014मध्ये आघाडीत “बिघाडी’ झाली त्यामुळे त्यांचा पराभव झाला अन् सत्ताही गेल्याने मुख्यमंत्री पदाचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले. मात्र, आगामी निवडणुकीत ते युतीत सहभागी होवून आमदार म्हणून निवडून आले आणि युतीचेच सरकार स्थापन झाल्यास अनुभवामुळे पाटील पुन्हा मंत्रीपद मिळेल, असा जाणकारांचा अंदाज आहे.
सध्या विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशी इंदापूरकरांची उत्कंठाही तितकीच शिगेला पोहोचली आहे. कारण राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचे व्यक्तीमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहीले जाते ते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून कोंडी करण्याचा प्रयत्न जोरदार सुरू आहे. त्यातच ज्या कॉंग्रेस पक्षासाठी त्यांच्या तीन पिढ्यांनी इमानदारीने काम केले त्या कॉंग्रेतेने देखील पाटील यांना “आळी मिळी गुप चिळी’ प्रमाणे अंधारात ठेवले आहे. दोन्ही कॉंग्रेसकडून पाटलांवर दबाव तंत्राचा वापर केला जात असल्यानेच त्यांनी स्वतःचे मत बाजूला ठेवत कार्यकर्त्यांच्या इच्छेप्रमाणे निवडणूक लढवून आपली ताकद सिध्द करण्याचा चंग बांधला असून बुधवारी (दि. 4) ते काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
25 वर्षांच्या शीतयुद्धाचा झाला उद्रेक
राज्याच्या राजकीय पटलावर हर्षवर्धन पाटील हे नाव खुप मोठे आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडीचे स्टार प्रचारक म्हणून त्यांनी धुरा सांभाळली होती. याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांनाही काही ठिकाणी फायदा झाला, हेही विसरुन चालणार नाही. त्याचबरोबर गेल्या 25 वर्षांपासून बारामती व इंदापूरमध्ये जे कुरघोडीचे शीतयुद्ध सुरू होते त्याचा आता मोठा उद्रेक झाल्यानेच पाटील यांच्यावर पुन्हा एकदा आपली सिद्धता सिद्ध करुन दाखवण्याची वेळ आली आहे. पण पाटील यांचा हा वार भविष्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला नक्कीच महागात पडणार असल्याचे जाणकारांकडून ऐकायला मिळत आहे.
कॉंग्रेसच्या राज्यातील नेत्यांची धाकधुक
हर्षवर्धन पाटील यांनी स्वतःच्या हिंमतीच्या बळावर दिल्लीदरबारी आपली छाप पाडली आहे. कॉंग्रेसचे राहुल गांधी, सोनिया गांधी त्याचबरोबर अन्य वरिष्ठांबरोबर असलेले सलोख्याचे संबंध हेच राज्यातील कॉंग्रेस नेत्यांची डोकेदुखी असल्याने पाटील यांची कोंडी करण्याचा डाव आखला;परंतु हा डाव कॉंग्रेस आघाडीवर उलटा पडणार यातही शंका नाही.