संतोष कोकरे
क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवाशांची वाहतूक; आरटीओसह वाहतूक शाखेचे दुर्लक्ष
ठोसेघर – सातारा शहरातील पोवई नाक्यावर सुरू असलेल्या ग्रेडसेपरेटरच्या कामामुळे शहरातील बससेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. ही बाब रिक्षा चालकांच्या पथ्यावर पडली असून काही रिक्षा चालकांकडून याचा गैरफायदा घेण्यासाठी रिक्षांच्या आसनव्यवस्था आणि बॉडीमध्ये बेकायदेशीर अनावश्यक बदल करून सात ते आठ प्रवाशांची कोंबाकोंबी केली जात आहे. याकडे आरटीओसह वाहतूक शाखेकडून सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे सातारा शहर आणि उपनगरातील रिक्षा प्रवास हा अतिशय धोकादायक बनला आहे.
परिवहन विभागाने रिक्षातून तीन अधिक एक प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. परंतु, सातारा शहरातील रिक्षा व्यवसायाची परिस्थिती पाहता चार अधिक एक प्रवाशी वाहतूक करण्याची मुभा देण्यात आली आहे. पोवई नाक्यावर सुरू असलेल्या ग्रेडसेपरेटरच्या कामामुळे सातारा शहरातील अंतर्गत आणि इतर शहरांमधून येणारी बससेवा पूर्णपणे कोलमडली आहे.
त्यामुळे प्रवाशांना नाईलाजाने नियोजित ठिकाणी वेळेत पोहचण्यासाठी रिक्षांचा आधार घ्यावा लागत आहे. गेल्या वर्षभरापासून विशेषतः उपनगरांतून शहरात शेअरिंग प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बेशिस्त आणि मुजोर रिक्षा चालक अतिरिक्त प्रवाशांची कोंबाकोंबी करण्यासाठी रिक्षांच्या आसनव्यवस्था आणि बॉडीमध्ये बेकायदेशीर अल्टरेशन केली आहेत. मात्र आरटीओसह वाहतूक पोलीस या रिक्षा चालकांवर कारवाई का करत नाहीत? असा प्रश्न प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.
रिक्षा पासिंग करताना आरटीओ अधिकाऱ्यांकडून अतिरिक्त प्रवाशांची वाहतूक टाळण्यासाठी मागील बाजूस उघड्या असणाऱ्या किंवा केलेल्या रिक्षांना लोखंडी जाळ्या बसवून मागील बाजू बंदिस्त असेल तरच रिक्षांचे पासिंग केले जाते. परंतु, रिक्षा चालक पासिंगनंतर लगेचच जाळी काढून टाकून मागील बाजूस आसनव्यवस्था बसवतात आणि पुन्हा अतिरिक्त प्रवाशांची धोकादायक वाहतूक सुरू करतात. अशा प्रकारे प्रवाशांची धोकादायक वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांना चाप घालण्यासाठी आरटीओसह वाहतूक शाखेकडून मागील बाजूस आसनव्यवस्था आणि उघड्या असणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशी आणि नागरिकांमधून केली जात आहे.