पुणे – गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये (एसटी) वाहतूक व्यवस्थेत अनेक बदल केले आहेत. मात्र, महामंडळाला प्रवाशांची जीवनवाहिनी ठरलेल्या “लालपरी’शिवाय (लाल डबा) दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे दिसून आले आहे. एसटी म्हणजे केवळ लाल डबा हे समीकरण ग्रामीण भागासह शहरात आजही टिकून आहे. त्यामुळे प्रवासी लालपरीला सर्वाधिक पसंती देत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
ग्रामीण भागांना जोडणारी “लालपरी’ प्रवाशांच्या हक्काची व भरवशाची असल्याचे दिसून आले आहे. एसटीच्या ताफ्यात वातानुकूलित आरामदायी बसेस दाखल होऊन देखील लालपरीची लोकप्रियता कमी झालेली नाही. राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचणाऱ्या “लालपरी’चे प्रवासी भारमान सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे.
राज्यभरात तब्बल 15 हजार 900 “लालपरी’ धावत असून 72 टक्के एवढे त्याचे उच्चांकी प्रवासी भारमान आहे. तर, “लालपरी’च्याच रातराणी श्रेणीअंतर्गत सध्या 310 बसेस धावत असून त्याचे प्रवासी भारमान 64 टक्के असल्याची आकडेवारी समोर आली आहे. सेमी लक्झरी श्रेणीतील “हिरकणी’च्या (एशियाड) सध्या 939 बसेस राज्याच्या विविध मार्गांवर धावत असून त्याचे प्रवासी भारमान 66 टक्के आहे. या आकडेवारीवरून राज्यभरात प्रवाशांची सर्वांधिक पसंती “लालपरी’ला असल्याचे दिसून आले आहे.
एस.टी. महामंडळाने मोठा गाजावाजा करत सुरू केलेल्या वातानुकूलित “शिवशाही’ बसेस एस.टी. महामंडळाकरिता ओझे ठरत आहे. सन 2016 मध्ये “शिवशाही’ बससेवा सुरू करण्यात आली. तर, सन 2018 मध्ये “शिवशाही’ची शयनयान बससेवा सुरू करण्यात आली. परंतु, “शिवशाही’चे होणारे अपघात, दुष्काळी मार्गांवर देण्यात येणाऱ्या “शिवशाही’च्या महागड्या सेवेमुळे प्रवाशांनी या सेवेकडे पाठ फिरवली आहे. 10 मार्गांवरील शयनयान सेवा मागील आठवड्यातच बंद करण्यात आली.
राज्यभरात “शिवशाही’च्या 1 हजार 30 बसेस धावत असून प्रवासी भारमान अवघे 52 टक्के एवढे कमी आहे. “शिवशाही’बरोबरच वातानुकूलित “शिवनेरी’ व “यशवंती’ (मिडी बस) सेवा देखील तोट्यात चालत असल्याचे दिसून आले आहे. राज्यभरात “शिवनेरी’च्या 123 बसेस धावत असून त्याचे प्रवासी भारमान 50 टक्के आहे. तर, “यशवंती’च्या 245 बसेस धावत असून त्याचे प्रवासी भारमान 14 टक्के एवढे निचांकी आहे. दरम्यान, तोट्यातील “शिवशाही’ऐवजी त्या मार्गांवर “लालपरी’ सोडून महामंडळाने आर्थिक तोटा भरून काढावा, अशी मागणी होत आहे.