नगर -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. या योजनांचा अनेकांना लाभ झालेला आहे. आज या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी भाजपच्या कार्याकर्त्यांनी प्रयत्न करावेत. राज्यातील आघाडी सरकार हे या योजनांचे श्रेय घेण्याचे काम करत आहे, तेव्हा भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या योजनांची माहिती लाभार्थींपर्यंत पोहचवून पक्षाचे काम करावे. प्रत्येक आघाडी, मंडळाची स्वतंत्र्य बैठका घेऊन सर्वांशी संपर्कात राहिले पाहिजे. नगरमध्ये पक्षाचे पदाधिकारी चांगले काम करत आहेत. पुढील काळात हे काम आणखी चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे, असे आव्हान भाजपाचे संघटनमंत्री रवी अनासपुरे यांनी दिले.
भाजप जिल्हा संघटनात्मक बैठकीसाठी संघटनमंत्री रवी अनासपुरे आले असता त्यांचे स्वागत जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी केले. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष प्रा.राम शिंदे, आ.बबनराव पाचपुते, शिवाजी कर्डिले, जिल्हा प्रभारी लक्ष्मणराव सावजी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा.भानुदास बेरड, प्रसाद ढोकरीकर, शाम पिंपळे, अशोक खेडकर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे म्हणाले की, आघाडी सरकार हे सर्वच बाबतीत अपयशी ठरत आहे. त्यामुळे त्यांचा नाकर्तेपणा भाजपच्या कार्यकर्त्यांनी जनतेसमोर आणावा. यासाठी पक्षाचे संघटन मजबूत होणे आवश्यक आहे, प्रत्येक बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांनी क्रियाशिल राहिले पाहिजे. केंद्रातील भाजपप्रणित सरकारच्या योजनांचा लाभ जनतेला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे म्हणाले, नगर जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढाळसली असून, याबाबत भाजपाच्यावतीने आवाज उठवत आहे. दूध प्रश्न, अतिवृष्टी, जिल्ह्यातील रस्ते, मंदिर उघडण्याबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी आंदोलन करुन प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला आहे.