Parliament Attack : संसदेच्या सुरक्षेतील त्रुटी गेल्या आठवड्यात उघड झाली. त्यावरून तापलेल्या वातावरणाची धग अद्याप कायम आहे. विरोधी पक्षांनी संसदेतच हा मुद्दा लावून धरल्यामुळे गदारोळ सुरू आहे. तर तपास संस्थाही हा प्रकार नक्की कसा घडला याचे धागेदोरे ( Delhi police ) शोधण्यासाठी घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. संशयितांचे अटकसत्र सुरू असून आतापर्यंत या प्रकरणात ९ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी तर अभूतपूर्व अशी शोधमोहीम हाती घेत तपासासाठी तब्बल ५० पथके स्थापन केली आहेत. ( Parliament Attack )
सागर शर्मा, मनोरंजन डी, नीलम आझाद, अमोल, विक्की, त्याची पत्नी, कैलास, महेश आणि घटनेचा कथित मास्टर माइंड ललित झा यांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. मात्र तरीही प्रकरणाच्या अगदी मुळापर्यंत जाण्यासाठी पोलिसांची ५० पथके सक्रिय झाली आहेत. देशातील विविध ठिकाणी छापेमारी करून तपास सुरू आहे. पोलिसांनी एकूण सहा राज्यापर्यंत धडक मारली आहे.
जी ५० पथके स्थापन करण्यात आली आहेत त्यातील प्रत्येक पथकाकडे वेगवेगळे काम सोपवण्यात आले आहे. कोणाला आरोपींची पाश्र्वभूमी शोधण्याचे आणि त्याचे घटनेशी संंबंध जोडणारे दुवे शोधण्याचे काम दिले गेले आहे तर काही पथकांकडे मिळालेल्या माहितीवरून छापेमारी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, संसदेत विरोधी पक्षांनीही हा मुद्दा लावून धरला आहे. संसदेच्या सुरक्षेत नेमकी त्रुटी कुठे राहीली याची माहिती स्वत: गृहमंत्र्यांनी सभागृहात येऊन दयावी अशी विरोधकांची मागणी आहे. देशातील सर्वोच्च व्यासपीठ असणारी संसदही सुरक्षित नाही का असा विरोधी पक्षांचा सवाल आहे.