मुंबई – अभिनेते परेश रावल यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. विनोदी भूमिकांसाठी ते खास करून ओळखले जातात. सध्या ते ‘ड्रीम गर्ल 2’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. मध्यंतरी हिंदी चित्रपटसृष्टीपेक्षा दाक्षिणात्त्य चित्रपटसृष्टीला प्रेक्षकांचा मोठा चाहता वर्ग वळत असल्याचे दिसत आहे. अनेक दिग्गज बॉलीवूड कलाकारांचे सिनेमे बॉक्सऑफिसवर अपयशी ठरले. त्यानंतर बॉलीवूडला मिळत असलेल्या या अपयशाबाबत परेश रावल यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
एका मुलाखतीदरम्यान परेश रावेल यांनी दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीचे कौतुक करत बॉलीवूडमधील चुका दाखवून दिल्या आहेत. ते म्हणाले की, “आमच्या बॉलिवूडवाल्यांकडे एकी नाही. जर यांच्याकडे ती एकी असती तर आज जे आपल्याला पाहायला मिळत आहे ते पाहायला मिळाले नसते. बॉलीवूड लोकांमध्ये एकता असेल तर कोणीही काही करू शकत नाही. साऊथमध्ये तुम्ही कोणाच्या विरूद्ध बोलून दाखवा. कोणीचीही हिम्मत होणार नाही. जे तिथे आहे ते इथे बॉलिवूडमध्ये नाही.”
पुढे ते म्हणाले, “दक्षिणेत आहे तशी एकता बॉलीवूडमध्ये असली पाहिजे. जर बॉलीवूडमध्ये एकता असती तर त्याच्यासोबत कोणीही काही करण्याची हिंमत केली नसती. दक्षिणेतील लोक आदर करतात म्हणून कोणीही दगडफेक करत नाही किंवा थिएटरची तोडफोड करत नाही.” दरम्यान, परेश रावल हे उत्कृष्ट अभिनेते आहेतच परंतु त्याचसोबत ते राजकारणातही सक्रिय आहेत. अनेकदा ते त्यांच्या विधानामुळे चर्चेत राहिले आहेत.