मुंबई – राज्यातील काही रस्त्यांवरील वाहतुकीची वर्दळ, रस्त्यांचा एकूण होणारा वापर विचारात घेता परभणी, बीड, औरंगाबाद जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्ग हे राज्य मार्गात तर ग्रामीण मार्ग प्रमुख जिल्हा मार्गात दर्जोन्नत करण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या रस्त्यांच्या दर्जोन्नतीला मान्यता दिली असून त्याचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे.
या मार्गावरील गावांची संख्या, लोकसंख्या, रस्त्यांवरील वाहतुकीची वर्दळ, रस्त्यांचा एकूण होणारा वापर विचारात घेऊन मार्गांचा दर्जा वाढविण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग राज्यमार्ग म्हणून दर्जोन्नत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य मार्ग २५३ पासून ढेंगळी पिंपळगाव-झोडगाव- तिडी-पिंपळगाव गुळी धामणगाव, राज्य मार्ग २२१ देऊळगाव गात डासाळा ते जिल्हा सरहद्द रस्ता हा सुमारे २७.७०० कि.मी. चा प्रमुख जिल्हा मार्ग २७ रस्ता दर्जोन्नत करण्यात आला असून तो आता राज्य मार्ग ४३२ या क्रमांकाने ओळखला जाणार आहे. परभणी जिल्ह्यातील पिंपरी बु. ग्रामीण मार्ग ३९ पासून ते सेलू राज्य मार्ग २२१ पर्यंतचा ५ कि.मी. लांबीचा रस्ता ग्रामीण मार्ग -१३६ या नावाने दर्जोन्नत करण्यात येत आहे.