दुबई – ऋषभ पंत व पृथ्वी शॉ यांनी मोटारींच्या जाहिराती करण्यापेक्षा आपल्या कामगिरीकडे जास्त गंभीरपणे लक्ष द्यावे, असा टोला विक्रमादीत्य सुनील गावसकर यांनी लगावला आहे.
कारकीर्द घडवण्याचे त्यांचे वय आहे, सध्या ते मोटारीची जाहिरात करणे तसेच त्यासोबत सेल्फी काढणे यातच दंग आहेत, त्यापेक्षा आपली कामगिरी कशी सरस हगोइल याकडेही पाहावे, असा टोलाही गावसकर यांनी लगावला आहे.
आयपीएल स्पर्धेत या खेळाडूंना त्यांच्या संघाने मोठी किंमत देऊन विकत घेतले आहे. किमान आपल्या दर्जानुसार तरी कामगिरी करणे त्यांचे प्राधान्य राहायला हवे, मात्र तसे दिसत नाही. ते अन्य गोष्टींमध्येच रममाण आहेत. शॉ व पंत चांगले खेळाडू आहेत, पण गेल्या काही सामन्यांतील त्यांची कामगिरी पाहिली तर त्यांचे खेळाकडे लक्षच नाही असे वाटते, असेही ते म्हणाले.
शॉ याने सुरुवातीच्या सामन्यात अत्यंत सरस कामगिरी केली. मात्र, त्यानंतर गेल्या सहा सामन्यांत तो अपयशी ठरला आहे. पंतही सातत्याने अपयशी ठरत आहे. तसेच खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतरही तो अनेक सामन्यांत अत्यंत बेजबाबदार पद्धतीने बाद झाला आहे. या दोन्ही खेळाडूंनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे.
शॉ व पंत यांना त्यांच्या कामगिरीवरून ओळखले जाईल, मोटारींसबोत फोटो काढल्याने नाही. त्यांनी असा वेळ घालवण्यापेक्षा संघाचे प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांच्याकडून चूका दुरुस्त करणे तसेच नेटमधील सरावात त्यांचे मार्गदर्शन घेणे यासाठी वेळ द्यायला हवा, असेही त्यांनी सांगितले.