मुंबई : विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच मुंडेंसह खडसे पक्षांतर करणार असल्याचेही बोलले जात आहे. उद्या १२ डिसेंबर ला दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या जयंती निमित्त गोपीनाथ गडावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्यात पंकजा मुंडे मोठी घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या मेळाव्याला सर्व समर्थकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन पंकजा यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी ‘आमचं ठरलंय’ या नावाखाली सोशल मीडियामध्ये सुरु केलेल्या मोहिमेमुळे मुंडे समर्थक कार्यर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंनी मौन सोडलं असून माध्यम प्रतिनिधींना दिलखुलासपणे उत्तरे दिली.
पंकजा मुंडेंच्या वेट अँड वॉच भूमिकेमुळे राज्यातील भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तर, पंकजा मुंडें भाजपाला सोडून दुसऱ्या पक्षात जातील, अशीची चर्चा आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचा घेतलेला पाठिंबा पंकजा मुंडेंना माहिती होता का? तो पाठिंबा योग्य का? महाविकास आघाडी स्थापन करुन तिन्ही पक्षांनी एकत्र येणं उचित आहे का? या प्रश्नावर पंकजा यांनी उत्तरे दिली आहेत.
या सर्व प्रश्नांवर बोलताना मुंडे म्हणाल्या ‘जर आम्ही राष्ट्रवादीसोबत जात असू, तर त्या तिघांची महाआघाडी चुकीची आहे, असे म्हणणं योग्य नाही. ते तिन्ही पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करत असतील तर ते अयोग्य असं मला वाटत नाही. त्यामुळे मुंडेंनी एकप्रकारे महाविकास आघाडीचे समर्थनच केले असल्याचे बोलले जात आहे.
दिवंगत नेते गोपीनाथ मुंढेंनी ज्या राष्ट्रवादीच्या विरोधात आपली हयात घालवली त्याच राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापण करताना तुम्हाला विचारले होते का? असा प्रश्न विचारला असता मुंडे म्हणाल्या, त्या निर्णयाचा मी भाग नव्हते, मला अंधारात ठेवलं असं मी म्हणणार नाही. पण, मी त्या निर्णयाचा भाग नव्हते. कारण, प्रत्येक निर्णयामध्ये पक्षाचे छोटे-छोटे ग्रुप्स काम करत असतात. एक-दोघं तीघं असे असतात. मी त्या निर्णयासंदर्भातील ग्रुपचा भाग नव्हते. त्यामुळे पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची कल्पनाच नव्हती असे म्हणायला वाव आहे.