कातरखटाव -राजस्थानमधून पाच दिवसांपूर्वी कातरखटाव (ता. खटाव) येथे आलेल्या 22 वर्षांच्या तरुणाचा करोना चाचणीचा अहवाल काल (दि. 1) रात्री पॉझिटिव्ह आल्यामुळे ग्रामस्थांना चांगलीच धडकी भरली आहे.
हा तरुण 28 जूनला राजस्थानमधून गावात आला. त्याला ताप येणे, धाप लागणे, अशी लक्षणे असल्याने त्याला सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या घशातील स्रावाचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. तो बाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्या परिवारासह संपर्कात आलेल्या पंधरा जणांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले आहे. कातरखटाव ग्रामस्थांनी आतापर्यंत नियमांचे पालन केले आहे.
असे असताना गावात बाधित रुग्ण सापडल्याने परिसरात घबराट आहे. तालुका प्रशासनाने वस्ती व गावामध्ये पाहणी करून खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामपंचायत व दक्षता समितीच्यावतीने ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. गावाच्या सीमा 14 दिवस बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार अर्चना पाटील यांनी दिले आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शेख, गटविकास अधिकारी रमेश काळे, डॉ. वैशाली चव्हाण, डॉ. स्वप्निल वायदंडे, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांनी गावात सर्वेक्षण केले.
गावात करोनाबाधित रुग्ण सापडल्याचे समजताच तहसीलदार काय सांगतात, हे ऐकण्यासाठी व्यापारी व ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर गर्दी केली होती. त्यामुळे अर्चना पाटील यांचा पारा चढला. एवढी गर्दी का केली आहे? लोकांनी आपापल्या घरी जावे. कुणीही 14 दिवस बाहेर पडायचे नाही, असे त्यांनी सुनावले. गावात अत्यावशक सेवा वगळता इतर दुकाने उघडू नये, अशी सूचनाही त्यांनी दिली.