सातारा – शहरातील मंगळवार पेठेतील लक्ष्मी भास्कर अपार्टमेंट व समर्थ कॉलनीच्या नागरिकांमध्ये अपार्टमेंटला देण्यात आलेल्या दोन नळ कनेक्शनवरून गुरुवारी जोरदार वादावादी झाली. अखेर लक्ष्मी भास्कर अपार्टमेंटने सामंजस्याची भूमिका घेतल्याने काही अंशी प्रश्न मार्गी लागला.
पाणीपुरवठा सभापती यशोधन नारकर व अभियंता दिग्विजय गाढवे यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांची समजूत काढली. लक्ष्मी भास्कर अपार्टमेंटच्या नागरिकांनी सामंजस्याची भूमिका घेत एक नळ कनेक्शन पालिकेला सरेंडर केले. त्याच कनेक्शनवरून समर्थ कॉलनीला पाणीपुरवठा करण्यात येऊन वादावर तोडगा काढण्यात आला.
समर्थ कॉलनी व लक्ष्मी भास्कर अपार्टमेंट यांच्यातील पाणीपुरवठ्याचा वाद गेल्या काही दिवसांपासून धुमसत होता. अनामत भरून मंजूर केलेली एक इंचाची लक्ष्मी भास्कर अपार्टमेंटची दोन कनेक्शन पालिकेने बुधवारी पूर्वसूचना न देता कट केल्याने येथील नागरिकांनी पाणीपुरवठा सभापती यशोधन नारकर यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली. अधिकृत नळ कनेक्शन परस्पर बंद करणे कायद्याने गुन्हा आहे तरी कनेक्शन तत्काळ जोडून देण्याची मागणी करण्यात आली. पाणी येत नाही म्हणून समर्थ कॉलनीतील नागरिक आक्रमक झाले. आनंदाश्रम वृध्दाश्रमासमोर जलवाहिनीचा व्हॉल्व्ह दुरूस्तीसाठी खुदाई करण्यात आली. मात्र, पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मुख्य जलवाहिनीवरून पाणी पुढे का सरकेना हे समजले नाही. गुरुवारी सकाळी पाणी पुरवठयावरून समर्थ कॉलनी व “लक्ष्मी भास्कर’च्या रहिवाशांमध्ये शाब्दिक चकमक झाली. पाणीपुरवठा सभापती यशोधन नारकर यांनी मध्यस्थी केली. “लक्ष्मी भास्कर’च्या रहिवाशांनी समजूतदारपणाची भूमिका घेत एक नळ कनेक्शन सरेंडर केले. त्याबदल्यात दुसऱ्या व्हॉल्ववरून त्यांना अर्धा इंची कनेक्शन जोडून देण्यात आले. एक कनेक्शन बंद केल्यावर समर्थ कॉलनीत पाणी पुरवठा पूर्ववत झाला.
तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत
समर्थ कॉलनी परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून पाणी येत नाही अशी नागरिकांनी तक्रार केली. मुळात या भागाला गणेश टाकीवरून समर्थ मंदिर चौकातून सहा इंची पाइपलाइन पाणी पुरवठा करते. तरीही टाकीच्या लेव्हलअभावी पाण्याला दाब मिळत नाही. गणेश टाकीतून यादा गोपाळ पेठेला सकाळी सात ते दहाच्या सत्रात पाणीपुरवठा झाल्यावर टाकी पूर्ण रिकामी होते. दुसऱ्या टप्प्यात टाकी पूर्ण भरली जात नाही. या टाकीची सकाळी अकरानंतरची घंटेवारी पूर्ण पंचेचाळीस मिनिटाची होत नाही. समर्थ कॉलनीला पालिकेच्या याच हलगर्जीपणाचा फटका बसतो. घंटेवारी करणारे व्हॉल्व्हमन राजकीय दबावामुळे पाणी पूर्णवेळ सोडत नसल्याचा त्रागा महिलांनी व्यक्त केला. सध्याचा व्हॉल्व्हमन तातडीने बदलावा, अशी मागणी करण्यात आली.