जम्मू – पाकिस्तानच्या सैन्याने जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेलगत केलेल्या गोळीबारामध्ये भारतीय लष्कराचे चार जवान जखमी झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाकिस्तानी सैन्याकडून मेंधर भागातल्या बालाकोट येथे चिथावणीखोर गोळीबार आणि हलक्या शस्त्राच्या आधारे मारा करण्यात आला. रविवारी रात्री 10.30 वाजता हा गोळीबार सुरू झाला आणि त्याला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तरही देण्यात आले, असे लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल देवेंदर आनंद यांनी सांगितले.
पाकिस्तानी सैन्याच्या या गोळीबारात भारतीय लष्कराचे चार जवान जखमी झाले. त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लष्कराची तुकडी “एलओसी’जवळच्या मोहिमेवर असताना पाकिस्तानी सैन्याने डागलेले दोन उखळी बॉम्ब् त्यांच्या जवळच पडले. त्यामध्ये हे चारही जवान जखमी झाले.
चौघाही जवानांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते आहे. गेल्या वर्षभरात पाकिस्तानकडून 2,050 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आणि त्यात 21 जणांचा मृत्यू झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने कालच सांगितले आहे.