चंडीगढ – नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्याचा गैरफायदा घेऊन पाकिस्तानी गुप्तचर संस्था (आयएसआय) सीमेलगतच्या पंजाबमध्ये शांतता भंग करण्याचे नापाक कारनामे करू शकते, असा इशारा त्या राज्याचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सोमवारी दिला.
नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणामध्ये आंदोलन, निदर्शनांचे सत्र सुरू झाले आहे.
अमरिंदर यांच्यासह कॉंग्रेसच्या काही नेत्यांनीही त्या कायद्यांचा निषेध करण्यासाठी धरणे आंदोलन केले. त्यावेळी बोलताना अमरिंदर यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकरी उद्धवस्त होईल.
राष्ट्रपतींनी विधेयकांवर स्वाक्षरी केल्याने त्यांचे रूपांतर कायद्यांमध्ये झाले. आता आम्ही तो विषय सर्वोच्च न्यायालयात नेऊ, असे सांगत त्यांनी कृषी कायद्यांना आव्हान देण्याचे सूतोवाच केले.
शेतकऱ्यांच्या असंतोषाचा गैरवापर पाकिस्तानी गुप्तचर संस्थेकडून केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवत अमरिंदर म्हणाले, कुणाच्या हाती बंदुका, बॉम्ब आणि ग्रेनेड देता येऊ शकतील याच्या शोधातच आयएसआय असते.
आमच्या सरकारच्या कार्यकाळात पंजाबमध्ये 150 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. त्याशिवाय, 700 शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली. सध्या पंजाबमध्ये शांतता आहे. मात्र, एखाद्याचे अन्नच हिरावले गेले; तर तो संतापणार नाही का? त्यातून त्याला आयएसआय जाळ्यात ओढेल, अशी टिप्पणीही त्यांनी केली.