मुंबई – वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या युतीला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला. भविष्यात असा प्रयत्न परत करु. जे महाराष्ट्रात घडले नाही, ते बिहारमध्ये घडवून आणू, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. एनडीएच्या सरकारला सत्तेत येऊ न देणे, हा बिहारमध्ये निवडणूक लढवण्याचा एकमेव उद्देश आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
बिहारमधील विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या असून राजकीय घडमोडींना वेग आला आहे. या निवडणूकांत वंचित बहुजन आघाडीही आपले नशीब आजमावीत आहे. याबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले, वंचित बहुजन आघाडीच्या प्रयोगातून महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढवत प्रस्थापित राजकीय पक्षांना धक्का देत रणनीती बदलली आहे. आता देशात नवीन राजकीय समीकरण आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याची सुरुवात वंचित बहुजन आघाडीने असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाबरोबर युतीने होत आहे.
बिहारमध्ये मुस्लिम, मागासवर्गीय आणि आदिवासी मिळून 40 टक्के समाज आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र आल्यावर कोणत्याही सरकारला पाडण्याची ताकद यांच्यामध्ये आहे. बिहार सरकार नागरिकता, आरक्षण यांच्या विरोधात आहे. त्यामुळे मौलवी, मौलाना तसेच सुशिक्षित मुस्लिम बांधवांना माझे सांगणे आहे की याबाबत विचार करा. आपण सर्वांनी एकत्र येऊन या सरकारला येत्या विधानसभा निवडणुकीत पाडू, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने राज्यात मोठी ताकद निर्माण केल्यानंतर आता उत्तरेकडे मोर्चा वळवला आहे. वंचित आघाडीने बिहार विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून ही निवडणूक स्वबळावर न लढवता समविचारी पक्षांशी आघाडी करून लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.