नवी दिल्ली – भारतासह सर्व शेजारी देशांबरोबरचे सर्व प्रलंबित वाद सोडवून सामोपचाराने लाभाचे संबंध प्रस्थापित करायचे आहेत, असे पाकिस्तानने म्हटले आहे. स्थायी शांततेसाठी आणि प्रादेशिक स्थैर्यासाठी जम्मू आणि काश्मीरचा महत्वाचा प्रश्न सोडवणे आवश्यक आहे, असे नवी दिल्लीतील पाकिस्तानचे प्रभारी आफताब हुसैन खान यांनी म्हटले आहे.
पाकिस्तान दिनाच्या निमित्ताने पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही भूमिका मांडण्यात आली आहे.
संयुक्त राष्ट्राच्या ठरावानुसार आणि जम्मू काश्मीरच्या जनतेच्या ईच्छेनुसार जम्मू काश्मीरचा प्रश्न सोडवणे आवश्यक आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. पाकिस्तानबरोबर सामान्य संबंध हवे असल्याचे भारतानेही यापूर्वी अनेकवेळा स्पष्ट केले आहे. हिंसाचार आणि दहशतवाद मुक्त वातावरणात सर्व प्रलंबित प्रश्नांवर चर्चेद्वारे तोडगा काढण्यात यावा, अशी भारताची भूमिका आहे.
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादामुळे व्यापार, कनेक्टिव्हिटी आणि नागरिकांमधील संवादही खंडीत झाला आहे. तसेच भारताविरोधात अपप्रचार करण्याचेही प्रयत्न पाकिस्तानकडून केले जात असतात, असे परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे.
दोन्ही देशांच्या लष्करी ऑपरेशन्सच्या महासंचालकांमध्ये युद्धबंदी करार झाला आहे. मात्र पहिल्या काही महिन्यांनंतर जुलै 2021 पासून पाकिस्तानकडून पुन्हा एकदा सीमेपलिकडून घुसखोरी आणि युद्धबंदीचे उल्लंघन होते आहे.