मुंबई – मागील काही दिवसांत पुण्यात गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महिला अत्याचाराच्या घटनाही सातत्याने घडत आहे. हा मुद्दा आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रश्नोत्तराच्या काळात पुण्यातील लोकप्रतिनीधींनी उपस्थित केला.
पुण्यातील खडकवासला मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी अवैध धंद्यांकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, मतदार संघातील वारजे भागांतील ओल्डनेस्ट, गोकुळनगर पठार, अमृतवेल सोसायटी, रामनगर झोपडपट्टी, कुलकर्णी हॉस्पीटल परिसर, कर्वेनगर हद्द, धनकवडी भागातील सहकार पोलिस स्टेशन अंतर्गत मोहन नगर, बालाजी नगर, अंबेगाव पठार, त्याचप्रमाणे धायरीत परिसरातील डीएसके रोड, अंबामाता मंदिर, खंडोबा मंदिर, पारे चौक अशा विविध ठिकाणी अवैध धंदे चालत आहेत. हे अवैध धंदे बंद होतील का असा प्रश्न तापकीर यांनी सभागृहात उपस्थित केला.
यावर गृहमंत्री वळसे पाटील यांनी अवैध धंदे बंद करणयासंदर्भात सूचना देण्यात येईल, असं सांगितलं.
भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे सभागृहात पुण्यातील मागील काही दिवसांतील गुन्ह्यांच्या घटनांविषयी सखोल माहित दिली. १७ मार्चरोजी १२ वर्षाच्या मुलीला घरातून ओढून बलात्कार करण्यात आला. १८ मार्चला पाषाणच्या टेकडीवर तरुण-तरुणीला शिवीगाळ करून दमदाटीने मोबाईल ऍपद्वारे ७२ हजार रुपये लुटले, दहा दिवसांपूर्वी येरवडा भागात २० ते ३० गाड्यांची गुंडांनी तोडफोड केली. त्याचे सीसीटीव्ही फुटेज आहेत. बोपोडी पोलिस चौकीजवळ चार ते पाच जणांनी एका युवकाचा धारदार शस्त्राने खून कऱण्यात आला. तसेच दुकाने फोडली गेली. या सर्व गुन्ह्यांबाबत शासन काय कारवाई करणार असून अशा घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना असल्याचा सवाल आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी उपस्थित केला.
हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी बाल गुन्हेगारीकडे लक्ष वेधलं. एका शाळकरी मुलीवर चाकू हल्ला झाला. बाल गुन्हेगारीकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी काय उपयोजना करण्यात येणार आहेत. माझ्या मतदार संघात दोन पोलिस स्टेशन मंजूर केली आहेत. काळे बराटे आणि फुरसुंगी येथील हे दोन्ही पोलिस स्टेशन कधी पूर्ण होतील, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच शहरी भागांत नार्कोटीक्स विभाग अधिक सक्षम करण्याची गरज आहे. महाविद्यालयातील मुलं व्यसनाधीन होतातय. हे रोखण्यासाठी एसीपी नार्कोटीक्स, पीआय नार्कोटीक्स असे काही पद निर्माण होऊ शकते का, असाही प्रश्न आमदार तुपे यांनी उपस्थित केला.
यावर गृहमंत्री वळसे पाटील यांनी म्हटलं की, पुणे शहरातील सर्व प्रतिनिधींची बैठक घेऊन सर्व समस्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. तसेच दोन पोलिस स्टेशनसाठी जागा उपलब्ध करून दिली तर ती लगेच सुरू करण्यात येईल. शिवाय महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये आमली पदार्थविरोधी मोहीम राबविण्यासाठी आपण सूचना केल्या असून हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येईल, असं वळसे पाटील यांनी म्हटलं.