इस्लामाबाद – इम्रान खान यांनी 9 मे रोजीच्या हिंसक आंदोलनाबद्दल पाकिस्तानच्या देशवासियांची माफी मागितली तरच त्यांच्याशी चर्चा केली जाईल, असे पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दर यांनी म्हटले आहे. इम्रान खान यांच्याबरोबरच्या चर्चेचा प्रस्ताव सत्तारुढ आघाडी सरकारने कालच फेटाळून लावला होता. त्यानंतर दर यांनी चर्चेसाठी इम्रान खान यांच्यासमोर “माफी मागण्याची’ पूर्वअट ठेवली आहे.
सरकारबरोबरच्या चर्चेसाठी इम्रान खान यांनी आपल्या पक्षातील 7 नेत्यांची समिती नियुक्त केली आहे. सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वमान्य तारखांची निश्चिती करण्यासाठी चर्चा व्हावी, असे इम्रान यांचे म्हणणे आहे.
हिंसक आंदोलनांच्या तपासाचा भाग म्हणून “पीटीआय’च्या शेकडो नेत्यांना अटक करण्यात आली आहे. या आंदोलनामुळे पक्षाच्या काही महत्त्वाच्या नेत्यांनी पक्षाचे राजीनामे द्यायलाही सुरुवात केली आहे.
9 मे पूर्वी सरकारने प्रामाणिकपणे “पीटीआय’बरोबर चर्चा केली होती. निवडणुकीच्या तारखा वगळता अन्य सर्व मुद्द्यांवर सहमतीही झाली होती, असे दर म्हणाले. शांततेने आंदोलन करण्याचा सर्वाना अधिकार आहे. मात्र विध्वंसक हल्ले निषेधार्ह असल्याचेही ते म्हणाले.