मुंबई – केंद्रातील भाजप सरकारने 9 वर्ष पूर्ण केली असून या 9 वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशामध्ये शासन आणि धोरणे सर्वांचा विकास करणारी असायला हवीत. परंतु, गेल्या नऊ वर्षांत एनडीए सरकारने त्यासाठी काहीही केलेले नाही. केंद्र सरकार आपल्या चुका सुधारून जनतेसाठी सुशासन करण्याचा प्रयत्नही करत नाही हे अत्यंत वाईट आहे, असा घणाघाती हल्ला माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला.
मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने कॉंग्रेसने देशभरातील प्रमुख शहरात पत्रकार परिषदा घेऊन केंद्र सरकारची पोलखोल केली. मुंबईतील टिळकभवन येथे पी. चिदंम्बरम यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. पी. चिदंबरम म्हणाले, देशाचा कारभार संविधानानुसार चालतो की नाही अशी चिंता वाढत आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यातील दरी वाढत असून ही आणखी एक चिंतेची बाब आहे. राज्य सरकारांच्या कार्यकारी अधिकारांमध्ये कपात करण्यात आली आहे. बिगर भाजपशासित राज्यांचे राज्यपाल व्हाईसरॉयसारखे वागत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
संसदीय नियम आणि कायद्यांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. खोट्या केसेस, तपासाच्या धमक्या देऊन राज्य सरकारांना अस्थिर करण्यासाठी केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. लोकशाहीचे स्वतंत्र आधारस्तंभ असलेल्या संस्था केंद्र सरकारने कमकुवत केल्या आहेत. मोदी सरकारच्या काळात लोकशाहीचा हा वटवृक्ष पोकळ झाला आहे.
संरक्षण व परराष्ट्र धोरणांवरही केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. पाकिस्तान, चीन, बांग्लादेश, श्रीलंका या शेजारी देशांशी आपले संबंध चांगले राहिले नाहीत. चिनी सैन्याने भारताच्या ताब्यातील भूभागात अतिक्रमण केले आहे आणि आजही ते व्यापलेले आहे, याचे भरपूर पुरावे आहेत. चिन सीमाभागात संरक्षण पायाभूत सुविधा वाढत आहे. तसेच सीमेवर नवीन वसाहती उभारत आहे. जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकींपासून भारतीय गस्त घालण्याचे प्रमाण कमी झाले आहे, असेही चिदंबरम यांनी म्हटले.