संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची पाकवर सडकून टीका
नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू काश्मीरविषयीचे कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान चांगलाच बिथरला आहे. तिळपापड झालेल्या पाकिस्तानवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी सडकून टीका केली आहे. मुळात पाकिस्तान हा भारताचा शेजारील देश आहे आणि पाकिस्तानसारखा शेजारी कोणत्याच देशाला भेटू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
केंद्रातील मोदी सरकारने काश्मीरातून कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने समझोता एक्स्प्रेस रोखली असून व्यापारी संबंध तोडण्याची टोकाची भूमिका घेतली आहे. पाकिस्तानच्या या वागणुकीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी संताप व्यक्त केला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ ऍण्ड ऍनलाइज् या संस्थेच्या वार्षिक बैठकीत त्यांनी पाकवर टीका केली. मागच्या 70 वर्षांपासून काश्मीर खोऱ्याला दिली जाणारी सापत्न वागणुक केंद्राने कलम 370 रद्द करून थांबवली आहे. पण, या निर्णयामुळे शेजारी असणाऱ्या पाकिस्तानला दुःख झाले आहे. त्यामुळेच ते शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत आहे. शेजारी देश पाकिस्तान हीच भारताची मुख्य समस्या आहे. तुम्ही तुमचा मित्र बदलू शकता पण शेजारी बदलणे तुमच्या हातात नसते आणि हा मुख्य अडसर आहे. त्यामुळे पाकिस्तानसारखा शेजारी कोणात्याही देशाच्या वाट्याला येऊ नये, अशी खंत राजनाथ सिंग यांनी व्यक्त केली.