कराड-पाटण तालुक्यात पुरामुळे भयावह परिस्थिती
कराडच्या जुन्या कृष्णा पुलाचे अँगल वाहून गेले
ढेबेवाडी विभागात शेकडो घरांची पडझड
कराड/सणबूर – गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा पाटण तालुक्यासह कराड तालुक्यालाही मोठा फटका बसला. पाटण तालुक्यातील अनेक पूल तेरा दिवसांपासून सलग पुराच्या पाण्याखाली गेल्याने या पुलांची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक घरांची पडझड झाली असून जमिनीही खचू लागल्याने कराड-पाटण तालुक्यात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.
ढेबेवाडी विभागात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने कहर केला असून अनेक पूल पाण्याखाली गेल्याने जनजीवन ठप्प झाले आहे. रस्ते, पूल, पिण्याच्या पाण्याच्या विहिरी वाहून जाण्याच्या अनेक घटना घडत आहेत. कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. ढेबेवाडी मंडलातील मोडकवाडी, सातर, जिंती, कोळेकरवाडी, निगडे, माईगडेवाडी, कारळे, उधवणे, रुवले, पानेरी, सणबूर, सळवे, महिंद, बाचोली, उमरकांचन, मराठवाडी, अंबवडे या गावातील शेकडो घरांची पडझड झाल्याचे समजते. यामधील जवळपास 60 घरांच्या पडझडीचे पंचनामे महसूल विभागाने केले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर अजुनही शेकडो पंचनामे करण्याचे बाकी आहे.
गेल्या दहा ते बारा दिवसांपासून डोंगर पठारावरील अनेक गावे पुराच्या पाण्यामुळे संपर्कहीन आहेत. तसेच गावातील वीज पुरवठा बंद असल्याने मोबाईल सुविधाही बंद आहेत. त्यामुळे या भागातील पडझडीची आकडेवारी मिळण्यास अडचणी येत आहेत. पाऊस पूर्णत: थांबल्यानंतर या सर्व गावातील घरांचे पंचनामे करून जास्तीत जास्त शासकीय मदत मिळवून देण्याचे आव्हान महसूल विभागापुढे आहे.
तसेच अनेक ठिकाणी लाईटचे पोल पडणे, तारा तुटून विद्युतप्रवाह बंद पडलेला आहे. मराठवाडी जवळ लाईटचा एक पोल पूर्ण वाकलेला असून कोणत्याहीक्षणी पडून धोका होऊ शकतो. मराठवाडी-उमरकांचन कोळेकरवाडी रस्त्यालगत अनेक ठिकाणी डोंगर खचलेला असून मोठ्या प्रमाणात भुसख्खलन झालेले आहे. उमरकांचन नवीन गावठाण ठिकाणी तर मोठे प्रमाणात भुसख्खलन झाल्याने गावठाणास धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे धरणालगत वसलेल्या सर्व नवीन गावठाणास डोंगराकडील बाजूंनी संरक्षण भिंती घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. उमरकांचन-कोळेकरवाडी या रस्त्यावरील फरशीपूल वाहून जाऊन रस्ता अनेक ठिकाणी खचलेला असून रस्त्यावरील संपूर्ण डांबर निघून गेले आहे. गेल्या दहा पंधरा दिवसात पडलेल्या पावसामुळे ढेबेवाडी परिसरात शासकीय आणि खासगी मालमत्ता नुकसानीचा आकडा काही कोटीच्या घरात असेल हे नक्की.
कुंभारगावला घराची भिंत कोसळली
ढेबेवाडी – मुसळधार पावसामुळे जमिनीमध्ये पाणी मुरून कुंभारगाव (मान्याचीवाडी ) ता. पाटण येथील जोतिराम रामचंद्र माने यांच्या घराची भिंत पडली. शनिवारी सकाळी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झालेली नाही. ऐन पावसाळ्याच्या दिवसात राहत्या घराची भिंत कोसळल्याने शालन वरेकर यांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पडलेल्या भिंतीचा पंचनामा करून मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तारळे ग्रामस्थांचे साकडे
तारळे – संततधार पावसामुळे तारळे विभागात मोठे नुकसान झाले आहे. यातून पूर्वपदावर येण्यास बराच अवधी लागणार असून ग्रामस्थांनी आता देवापुढे साकडे घातले आहे. तारळे विभागात मोठ्या प्रमाणात घरांच्या पडझडी झाल्या आहेत. जमीनी खचू लागल्याने लोकांच्यात माळीण आठवणीने धडकी भरली आहे. ठिकठिकाणी रस्ते मधूनच खचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. बेंदवाडी, सवारवाडी, पाबळवाडी, दुसाळे येथील जमिनी 4 ते 5 फूट खचल्या आहेत. जळव, पाबळवाडी रस्ता खचला आहे.
घरांच्या पडझडीचे सत्र सुरूच आहे. नुने 3, दुटाळवाडी 6, कोंजवडे 9 , तारळे सह अंतर्गत वाड्यांमध्ये 22 घरांच्या भिंती संततधार पावसाने कोसळल्या आहेत. घरांच्या पडझडीचे पंचनामे झाले आहेत. अजूनही काहींचे पंचमाने सुरू आहेत. अजून दोन दिवस तरी हे काम सुरूच राहील अशी माहिती महसूल विभागाने दिली. तालुक्यात मोठे नुकसान झाले असल्याने महसूल विभागापुढे मोठे आव्हान आहे. तरीही कामात कोणतीही कुचराई न करता भर पावसात जनतेला मदतीचा हात देण्यासाटी तारळे विभागातील अधिकारी झटत आहेत.