पुणे – भावनिक न होता लोकसभेला व विधानसभेलाही माझ्या विचारांच्या उमेदवाराला मतदान करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीकरांना केले होते.अजित पवारांच्या या आवाहनाबाबत शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी काही निवडणुकीला उभा राहणार नाही असं स्पष्ट मत यावेळी शरद पवारांनी व्यक्त केलं. राष्ट्रवादी पक्ष हातातून गेल्यानंतर शरद पवार यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला.
आमची शेवटची निवडणूक आहे म्हणून लोक तुम्हाला भावनिक करतील असं विधान अजित पवार यांनी केलं होत. अजित पवारांच्या या आवाहनाबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले,”मी काही निवडणुकीला उभा राहणार नाही. त्यामुळे भावनात्मक बोलणं योग्य नाही. बारामतीची लोक चोखंदळ आहेत. बारामतीत केलेल्या कामाला लोकांनी पावती दिलेली आहे”.
अजित पवार यांनी नेमकं काय केलं होत आवाहन ?
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न होईल. कुणी डोळ्यामधी पाणी आणतील मात्र भावनिक न होता लोकसभेला व विधानसभेलाही माझ्या विचारांच्या उमेदवाराला मतदान करा, असे आवाहन अजित पवारांनी केले बारामतीकरांना केले होते. अजित पवार म्हणाले की, काहीजण म्हणतील आमदारकीला त्यांना व खासदारकीला आम्हाला मतदान करा. मात्र तसे चालणार नाही. एक तर त्यांना करा किंवा मला मतदान करा. आपल्या विचारांचा खासदार निवडून आला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित भाईंना मी सांगू शकतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध होऊ शकतो.
राष्ट्रवादी गमावल्यानंतर पवारांची पहिली प्रतिक्रिया
“निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्ष दुसऱ्याला दिला. ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्याला सोडून दुसऱ्याला पक्ष देण्यात आला. म्हणजे पक्षाचा अध्यक्ष असताना दुसऱ्याला पक्ष दिला गेला हे पहिल्यांदाच घडलं आहे हा निर्णय आश्चर्यकारण आहे. आमचं २ वेळा चिन्ह गेलेलं आहे, चिन्ह मर्यादीत काळासाठी उपयुक्त असत जनता या सर्व गोष्टींना समर्थन देणार नाही. सुप्रीम कोर्ट याबाबत योग्य तो निकाल देईल असा आशावाद देखील पवारांनी यावेळी व्यक्त केला.