खालापूर – भाताचे कोठार समजल्या जाणाऱ्या खालापूर तालुक्यातील भातउत्पादक विविध समस्यांनी हैराण झाला. पेरणीपासून तर झोडपणीपर्यंतच्या खर्चात दर वर्षी वाढ होत असल्याने खर्चाचे आव्हान उभे ठाकले. त्यास कसे तोंड द्यावे, असा प्रश्न उत्पादकांसमोर निर्माण झाला आहे. सध्या तालुक्यात भात झोडपणीची कामे अंतिम टप्प्यात आल्याने शेतकरी राजा शेतीच्या कामातून चिंतादूर होणार आहे.
हल्ली भातपिकास वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासले असल्यामुळे उत्पन्नात घट होत आहे. परतीच्या पावसामुळे हैराण झालेला शेतकरी डोळ्यासमोर पिकाचा झालेला पाचोळा पाहून हवालदिल झाला असल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे. वाढलेल्या मजुरीचा खर्च पाहता झोडपणी करणे देखील तोट्याचे ठरते की काय, अशी शंका शेतकरी वर्गाला वाटू लागली आहे.
पेरणी ते झोडपणीपर्यंतचा खर्च वाढल्याने भातशेती म्हणजे अगोदरच आतबट्ट्याचा व्यवहार मानला जातो. पेरणीपासून ते झोडपणीपर्यंतचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात औषधांच्या खर्चाचा भुर्दंड आल्याने तोट्यात वाढ होत असून त्यातच मजुरीदेखील डोईजड झाली आहे.
खालापूर तालुक्याचे प्रमुख पीक समजल्या जाणाऱ्या भात शेतीला अनेक समस्यांनी ग्रासले असून, भात शेती करणे तोट्याची झाली आहे. मजुरीचे दाम दुप्पट झाल्याने शेती करणे अवघड झाल्याने शेतकरी राजा पुढे भात झोडपणीकरीता असंख्य प्रश्न उभे ठाकले असून, तालुक्यातील भात झोडपणीची कामे अंतिम आल्याने शेतकरी राजा भातशेती कामातून चिंतादूर होणार आहे.