हिर्डोशी खोऱ्यात दोन दिवसांपासून पावसाची विश्रांती
हिरडस मावळ – भोर तालुक्यातील पश्चिम भागातील हिर्डोशी खोऱ्यात गेल्या आठवड्यात भात लावणीला सुरुवात झाली होती; परंतु गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे लावण्या रखडल्या आहेत आणि शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
मागील आठवड्यात पडलेल्या पावसात धूळ वाफेत पेरणी केलेल्या भात पिकांची लावणीला सुरुवात झाली होती; परंतु गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असल्याने भात खाचरातील पाणी अटून भात खाचरे कोरडी पडू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. यामुळे या भागातील भात लावणीला आलेल्या रोपांची पाण्याअभावी लावणी रखडली आहेत.
काही शेतकऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी पडत असलेल्या पावसामुळे भातलावणीच्या कामासाठी मजूर ठरवले होते; परंतू लावण्याच पाण्याअभावी पुढे गेल्याने शेतकऱ्यांचे भात लावणीचे ठरलेले सर्व नियोजन फसले आहे. शेतकऱ्यांनी धूळवाफेवर पेरलेल्या भाताच्या रोपांची उगवण चांगली झाली होती, त्यामुळे लागवडीला सुरुवात केली. मात्र पावसाने ओढ दिल्याने भाताच्या लावण्या रखडल्या.
हिर्डोशी भागात जुलै महिन्यात सूर्याचे दर्शन होत नाही; परंतू सध्या चक्क ऊन पडत आहे. पुढील एक-दोन दिवसात पाऊस पडण्याची अपेक्षा आहे; परंतू त्यातूनही पावसाने फसवले तर भात रोपे वाळण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण होत आहे.