पाचगणी – आंतरराष्ट्रीय दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडताना आपल्या जीवाची पर्वा न करता हौतात्म्य स्वीकारणाऱ्या जावळीतील केडांबे गावाचे सुपुत्र तुकाराम ओंबळे यांच्या जन्मगावी उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या एक हेक्टर जागेचा प्रश्न महसूल विभागाकडून मार्गी लागला आहे. या स्मारकाच्या एक हेक्टर जागेचा सातबारा सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने झाला आहे. जागेचा प्रश्न मार्गी लागला असल्याने आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दहा कोटी रुपयांचा निधी सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून लवकरात लवकर मिळवून स्मारक उभारणीचे काम लवकरच सुरु होणार असल्याची माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दै. “प्रभात’ला दिली.
ते म्हणाले, “जावळी तालुक्यांचा आमदार म्हणून अजित पवार यांच्याकडे स्मारकाबाबतीत पाठपुरावा केला आहे. अजित पवार यांनी तुकाराम आंबळे स्मारकाकरीता निधी उपलब्ध केला आहे. मात्र, महसूल विभागाकडून जागेच्या बाबतीत झालेल्या दिरंगाईमुळे स्मारक बांधकामास उशीर झाला. स्मारकात भागातील विद्यार्थ्यांकरीता सुसज्ज अशी अभ्यासिका उभारण्यात यावी ज्यामुळे स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल.’ राज्य शासनाकडे दहा कोटी रुपयांची मागणी करणार असून अजित पवार हा निधी नक्कीच देतील, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
जावळीचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी केडांबे गावची गट नंबर 159 मधील एक हेक्टर क्षेत्र हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाकरीता जिल्हाधिकाऱ्यांकडे हस्तांतरीत करण्याचे काम पूर्ण केले आहे. हुतात्मा तुकाराम ओंबळे यांचे जन्मगावी रखडलेले स्मारकांच्या जागेचा प्रश्न 13 वर्षांनीच अखेर मार्गी लागला आहे. जागा मिळाल्यानंतर निधीकरीता प्रशासन व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे महत्वपूर्ण ठरणार आहे. जावळीच्या सुपुत्राचे स्मारक त्याच्या जन्मगावी उभारुन येणाऱ्या पिढ्यांना त्यांनी पत्करलेल्या हौतात्मातून अखंड उर्जेचा स्रोत सदैव तेवत राहवा, अशी अपेक्षा सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.