नवी दिल्ली – भारतात नव उद्योजकांची संख्या वेगाने वाढत आहे. नुकतीच भारतामधील युनिकॉर्नची संख्या 100 च्या पुढे गेले आहे. ज्या स्टार्ट अप्चे बाजार मूल्य एक अब्ज डॉलरपेक्षा म्हणजे 7, 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे अशा स्टार्ट अप्ना युनिकॉर्न म्हणतात. या नवउद्योजकांनी यशस्वी होण्यासाठी उद्योजकीय मूल्यावर भर दण्याची गरज आहे, असे ओयो या कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश अग्रवाल यांनी म्हटले आहे.
भारतामध्ये युनिकॉर्नची संख्या 100च्या पुढे गेल्याबद्दल ट्विटरवरून जारी केलेल्या निवेदनात अग्रवाल यांनी म्हटले आहे की, या नवउद्योजकांनी खडतर परिस्थितीत उद्योग सुरू केले असले तरी या उद्योगांचे मूल्यांकन परिस्थितीजन्य कारणामुळे कमी-जास्त होत राहते. यामुळे त्यांनी नाउमेद होण्याची गरज नाही.
आपल्या उद्योगावरील विश्वास मूल्याधारित प्रशासनाच्या आधारावर कायम ठेवून त्यांनी वाटचाल करण्याची गरज असते. भारतामध्ये कमी काळामध्ये 100 युनिकॉर्न उद्योग निर्माण झालेले आहेत. मात्र त्यामुळे आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. पुढील काही काळातच भारतातील यूनिकॉर्नची संख्या एक हजार पेक्षा जास्त होणार असल्याचा दावा त्यांनी केला.
काही वर्षापूर्वी भारतामध्ये वर्षाला केवळ 1 ते 2 युनिकॉर्न तयार होत होते. मात्र आता वर्षाला बऱ्याच प्रमाणात युनिकॉर्नची संख्या वाढत आहे. भारतातील तरुण उच्च तंत्रज्ञानाचे शिक्षण घेऊन नवे उद्योग सुरू करण्याचे धाडस करीत आहेत.त्यांना भारतातून भांडवल पुरवठा होतो. त्याचबरोबर जागतिक पातळीवरून भांडवल पुरवठा होत आहे.
छोट्या शहरातही स्टार्ट अप्
भारतात फक्त मोठ्या शहरांमध्ये स्टार्टअप निर्माण होत नाही तर छोट्या शहरांमध्येही मोठ्या संख्येने स्टार्टअप् होऊ सुरू होऊ लागले आहेत. ही अतिशय समाधानाची बाब आहे. इंटरनेटच्या क्रांतीमुळे मोठ्या शहरातील तरुणांना जे स्त्रोत उपलब्ध होत आहेत तेच स्त्रोत छोट्या शहरातील तरुणांना होत असल्यामुळे भारतभर उद्योजकीय चैतन्यचा विकास येत होत आहे.